महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 21, 2022, 12:52 PM IST

ETV Bharat / city

Hanuman chalisa Raw : हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर 4 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

हनुमान चालिसा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्याने शिवसेनेवर टीका केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र याप्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला करण्यात येणार आहे.

Hanuman chalisa Raw
संग्रहित छायाचित्र

मुंबई -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालिसा प्रकरणात सत्र न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन दिला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर राणांनी न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी काही कारणास्तव सुनावणी होऊ शकली नाही. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.

लोकसभा अधिवेशनामुळे राणा दाम्पत्य गैरहजर -लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनामुळे खासदार नवनीत राणा अनुपस्थित राहिल्या. तसेच मागील सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांच्याकडून राणा दाम्पत्याचा जामीन तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. तर राणा दाम्पत्याचे वकील यांनी नवणीत राणा आणि रवी राणा यांनी कुठल्याही प्रकारच्या नियमाचे उल्लंघन केलेले नाही. तसेच दिलेल्या अटी शर्थींचे उल्लंघन राणा दाम्पत्याने केले नाही. त्यामुळे सरकारकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण -सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला.

राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल -पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्या दिवशीची राणा दाम्पत्याची रात्र पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details