महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 21, 2020, 8:48 PM IST

ETV Bharat / city

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, मोहरम साधेपणाने साजरे करावेत - गृहमंत्री अनिल देशमुख

कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. दिनांक २२ पासून राज्यात गणेशोत्सव हा सण सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

Ganesh festival and Moharram 2020
गणेशोत्सव आणि मोहरम 2020

मुंबई - कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी गणेशोत्सव तसेच मोहरम साध्या पदध्तीने करावेत, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. दिनांक २२ पासून राज्यात गणेशोत्सव हा सण सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी गृहविभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

१) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

२) कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच माननिय न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

३) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.

४) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्‍य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.

५) उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे. तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

७) आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

८) श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट आणि फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे, तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

१०) श्री च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.

११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. या सर्व सूचनांचे पालन करून राज्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

हेही वाचा -तामिळनाडूमध्ये घरगुती गणपतींना परवानगी; सार्वजनिक मंडळांवर बंदी कायम

दिनांक २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट व ३० ऑगस्ट हे तीन दिवस मोहरम संदर्भात महत्वाचे असून, हा दुखवटा पाळण्यात बाबतही गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात मातम मिरवणूक, वाझ/मजलीस,ताजिया/आलम, सबील/छबील संदर्भात सूचना आहेत.

मातम मिरवणूक -

कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमाप्रमाणे मोहरम दरम्यान देखील आपापल्या घरात राहूनच दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातम देखील शासनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनीदेखील एकत्रीत मातम /दुखवटा करू नये. वाझ/मजलीस- हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत.

ताजिया/आलम - ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही.

सबील/छबील - सबील/छबील बांधण्यास संदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदरील ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे.

कोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही.

कोविड -१९ च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान, आरोग्य, प्लाझ्मा शिबिरे, असे उपक्रम राबवण्यात यावेत. अशा उपक्रमांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती करावी.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या *नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. कोरोना विरुद्धचे युद्ध आपल्या सर्वांना एकत्रितपणे लढायचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी शासन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निमित्ताने केले आहे.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षणासाठी चक्क झाडावर भरली शाळा

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा कारभार जयंत पाटलांकडे

सहकार व पणन मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांची गेल्या काही दिवसापासून तब्येत बरी नसल्याने त्यांच्याकडे असलेला सहकार पणन या मंत्री पदाचा तात्पुरता कार्यभार त्यांच्या अनुपस्थितीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

बाळासाहेब पाटील यांच्यावर मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे उपचार सुरू आहेत. मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत असून त्यांच्या या वैद्यकीय कारणामुळे सहकार व पणन विभागातील अनेक निर्णय रखडले होते. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र शासन कार्य नियमावली मधील नियम 6 मधील तरतुदीनुसार बाळासाहेब पाटील यांच्या वैद्यकीय कारणासाठी त्यांच्या अनुपस्थितीत तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांच्याकडील सहकार पणन या खात्याचा कार्यभार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा जीआर जारी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details