मुंबई -काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ED Enquiry ) यांच्या चौकशी सत्रामुळे काँग्रेस संतप्त झाली असून याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने राजभवनावर धडक दिली. दरम्यान, राज्यपालांनी भेट नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला. राज्यपालांनी आरोप फेटाळून लावत, काँग्रेसच्या विनंती मुळेच भेट रद्द केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या आरोपाचे खंडन -नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सलग तीन दिवस या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी राहूल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहेत. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन निदर्शने केली जात आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या नेत्यांनी आज आंदोलने केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी राजभवनवर धडक देत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, राज्यपाल कोशारी यांनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.