मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार ( Government ) हा वाद महाराष्ट्रसाठी नवा नाही. राज्यपाल आपल्या भाषणांमधून नेहमीच सरकारला चिमटे काढत असतात. असाच काहीसा चिमटा राज्यपालांनी मंगळवारी देखील (दि. 26 एप्रिल) काढला. ते स्काऊट आणि गाईडच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅवेलीन येथे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना त्यांनी राज्यातील विज संकटावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे.
भाषणात काय म्हणाले राज्यपाल ? -स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल सर्वांनी नेहमी खरं बोललं पाहिजे, सत्यवचन याबाबत मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्यपाल म्हणाले, जरुरी नाही सर्वांनी मंत्री, प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजे तुम्ही जिथे कुठे असाल ते काही काम करावे ते प्रामाणिकपणे करा मन लावून करा. सूर्य रात्रीचा प्रकाश देऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी दिवाच लागतो. अनेक गावात लाईटच नसते. असते का लहान मुलांनो तुम्हीच सांगा ?" राज्यपालांच्या प्रश्नावर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडून नाही, असेच उत्तर आले. यावर राज्यपालांनी लगेच मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाहिले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली.