महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

असे वकील ज्यांनी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांची केली वकिली; जेठमलानींनी लढलेले वादग्रस्त खटले

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती.

By

Published : Sep 8, 2019, 11:04 AM IST

Updated : Sep 8, 2019, 1:13 PM IST

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी

मुंबई- ज्येष्ठ वकील आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांचा अल्पसा जीवन परिचय आणि त्यांनी लढलेले वादग्रस्त खटले.

देशाचे प्रसिद्ध वकील राम जेठमलनी यांचा जन्म आत्ताच्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये 14 सप्टेंबर १९२३ ला झाला. जेठमलानी यांचे वडील बोलचंद गुरमुख दास जेठमलानी आणि आजोबा वकील होते. कदाचित त्यामुळेच राम जेठमलानी यांनाही वकिलीमध्ये रस निर्माण झाला असावा. जेठमलानी यांनी वयाच्या १७ व्या वर्षीच कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांच्या पहिल्याच खटल्यामुळे ते चर्चेत आले होते. तो खटला होता नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार. याच खटल्यावर आधारीत अक्षयकुमारचा 'रुस्तुम' नावाचा चित्रपटही आला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून यशवंत विष्णु चंद्रचूड यांनी काम पाहिले. जे पुढे देशाचे सरन्यायाधीश झाले. जेठमलानी यांनी व्यवसायाच्या सुरुवातीपासून आपण लंबी रेस का घोडा असल्याचे सिद्ध केले होते. अर्थातच नंतर ते फारच प्रसिद्ध झाले.

नानावटी खटल्यानंतर जेठमलानी माध्यमांमध्ये खूप झळकले. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि दिल्लीतील विविध न्यायालयात स्मगलर आणि गुन्हेगारांच्या बाजू मांडल्या. त्यामुळे 70, 80 च्या दशकात जेठमलानी 'स्मगलरांचे वकील' म्हणून प्रसिद्ध झाले. राम जेठमलानी हे देशातील महाग वकिलांपैकी एक होते. ते एखाद्या खटल्यासाठी कोट्यवधी रुपये फी घेत होते.

सुरुवातीपासून जेठमलानी यांचा कल राजकरणाकडे होता. त्यामुळे खटला लढताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी सीपीआयचे आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्त्याप्रकरणात शिवसेनेची बाजू लढली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर देशातील कोणताच वकील आरोपी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांच्या बाजून लढायला तयार नव्हते. त्यावेळी राम जेठमलानी यांनी पुढे येऊन तो खटला लढला होता.

मुंबईचा कुप्रसिद्ध डॉन हाजी मस्तान याच्यावरील अनेक स्मगलिंगच्या खटल्यात जेठमलानी यांनी मस्तानची बाजू मांडली. तर, 2G घोटाळ्यात तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांची कन्या डीएमके नेता कणिमोळी यांच्या बाजूने त्यांनी खटला लढला होता. गाजलेल्या सोहराबुद्दीन एनकाउंटर खटल्यात सध्याचे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या बाजून त्यांनी खटला लढला होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदुरप्पा यांच्या अवैध खननच्या खटल्यात त्यांनी येदुरप्पा यांची बाजू मांडली.

अन्य काही गाजलेले खटले -

  • शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या बचावासाठी जेठमलानी धावून गेले होते.
  • रामलीला मैदानात धरणे आंदोलन करणारे बाबा रामदेव यांच्या झालेल्या कारवाईवेळी रामदेव बाबांच्या बाजूने ते लढले.
  • चारा घोटाळा : माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (2013)
  • अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी आरोपी आसाराम बापू यांची बाजू त्यांनी मांडली.
  • तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता आणि हवाला डायरी कांड खटल्यात भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या बाजून लढले.
  • उद्योगपती सहारा प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांचा खटला ते सर्वोच्च न्यायालयात लढले.

दरम्यान, २०१७ साली त्यांनी वकील व्यवसायातून निवृत्ती घेतली.

Last Updated : Sep 8, 2019, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details