कोल्हापूर- शिवकुमारच्या छळामुळे दीपाली चव्हाण सारख्या सहकारी मैत्रिणीला आम्ही गमावले आहे. त्याला जबाबदार उपवसंरक्षक विनोद शिवकुमारला बडतर्फ करा. त्याचबरोबर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना निलंबित करा, अशी मागणी कोल्हापूर वन विभागीय कर्मचाऱ्यांनी केली. राज्य सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, अन्यथा ५ एप्रिलपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हातील कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. राज्यभरात संताप व्यक्त होत असून संशयित उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मृत्यूनंतरही दीपाली चव्हाण यांला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आरोपींना शिक्षेची मागणी करत राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. शिव कुमारला पाठीशी घालणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.