मुंबई -महाराष्ट्र सरकारने 1 जून ते 31 जुलै दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवरती ( Ban On Fishing In June And Jully ) बंदी घातली आहे. 1 जून ते 31 जुलै हा काळ माशांच्या प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या संरक्षणासाठीच दरवर्षीप्रमाणे यंदाही अशी बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय नुकताच मरिन फिशरीज रेगुलेशन अॅक्ट 1981 अन्वये ( Fishring Regulation Act 1981 ) जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून बारा नॉटिकल मैलाच्या आत यांत्रिकी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या काळात सरकारने मच्छिमारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता कोळी समाजाकडून करण्यात येते आहे.
'दोन महिने खायचं काय?'-शासनाने हा दोन महिन्याचा मासेमारी बंदीचा काळ लागू केला ही चांगली गोष्ट आहे. पण, या दोन महिन्यात आम्ही खायचं काय? एकट्या आमच्या मच्छीमार वसाहतीत साधारण 15 हजार मच्छीमार कुटुंब राहतात. आज या 15 हजार कुटुंबांसमोर पुढच्या दोन महिन्याच्या प्रश्न उभा आहे. याआधी आम्हाला या दोन महिन्याच्या काळात अनुदान मिळायचं ज्यावर आमचा उदरनिर्वाह दोन महिन्याचा व्यवस्थित चालायचा. मात्र, आता हे सर्व बंद झाल्याने या महागाईत कसं जगायचं हा आमच्या समोर प्रश्न आहे, असे मच्छिमार सर्वोदय सोसायटीचे माजी चेअरमन जयेश भोईर यांनी म्हटले आहे.
'मच्छीमारांचे करोडोंचे नुकसान'- या दोन महिन्यात एका छोट्या बोटीचे उत्पन्न जरी पाहिले तरी ते साधारण 2 ते अडीच लाख रुपये असते. मोठ्या बोटींचे उत्पन्न याहून अधिक असते. त्यामुळे अशा एका बोटीमागे किमान 2 लाख रुपये जरी नुकसान पकडलं तर फक्त अशा अनेक बोटी मच्छीमार नगर वसाहतीत आहेत. या सर्वांच्या नुकसानीचा आकडा हा कोटीच्या घरात आहे. एका बोटीवर साधारण सहा जण काम करतात. म्हणजे सहा परिवारांचे एका बोटीवर घर चालत असतं. मात्र, आता मच्छीमारीच बंद झाल्याने अनेक कुटुंबारवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया मच्छीमार धनेश मेहेर यांनी दिली आहे.
'प्रत्येकी 15 हजारांची मदत करावी' -शासनाने या संदर्भात लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा. प्रत्येक मच्छीमाराला दोन महिन्याची कमीत कमी 15 हजार रुपये मदत करावी. जेणेकरून या दोन महिन्यात ते आपलं आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकतील. महाराष्ट्र प्रमाणे इतर राज्यांमध्ये काही कालावधीसाठी मासेमारी बंद असते. मात्र, तो काळ साधारण एप्रिल आणि मे महिन्या दरम्यानचा असतो. जून आणि जुलैमध्ये मासेमारी बंद असते. त्यामुळे या कालावधीत मुंबईत बाजूच्या राज्यांमधून म्हणजे केरळ कर्नाटक गुजरात अशा इतर राज्यांमधून मच्छी आणली जाते. याचा खर्च जास्त असल्याने या माशांच्या किमती जवळपास दुपटीने वाढतात. त्यामुळेच आता सध्या मासे महाग मिळत आहेत. त्यामुळे शासनाने मदतीचा विचार करावा, अशी मागणी भोईर यांनी केली.
हेही वाचा -Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी कारवाई; फरार सौरभ महाकालला अटक