महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरेत आगीचे सत्र सुरूच; पर्यावरणप्रेमी घालणार आता सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंना साकडे

आरे हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. त्यामुळे या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी, आरे जंगल वाचवण्यासाठी आदिवासी, पर्यावरण प्रेमी 'सेव्ह आरे'च्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आरेतील जागा लाटण्यासाठी भूमाफिया, बांधकाम व्यावसायिक वेगवेगळ्या शकला लढवताना दिसतात.

By

Published : Mar 5, 2021, 9:20 PM IST

आरेत आगीचे सत्र सुरूच
आरेत आगीचे सत्र सुरूच

मुंबई- गोरेगाव येथील आरे जंगलात मागील 15 दिवसांपासून सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. या आगी नैसर्गिकरित्या लागत नसून त्या जाणीवपूर्वक लावल्या जात असल्याचा आरेवासीय आणि पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. तर या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस, आरे कॉलनी प्रशासन, अग्निशमन दल आणि वन विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. पण, त्याचा काहीही फायदा होत नसून आगीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करणार आहेत.

भूमाफिया, बांधकाम व्यावसायिकांकडून असे प्रकार?

आरे हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. त्यामुळे या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी, आरे जंगल वाचवण्यासाठी आदिवासी, पर्यावरण प्रेमी 'सेव्ह आरे'च्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आरेतील जागा लाटण्यासाठी भूमाफिया, बांधकाम व्यावसायिक वेगवेगळ्या शकला लढवताना दिसतात. त्याचाच भाग म्हणून आरेत मोक्याच्या ठिकाणी मोठ्या आगी लावत जंगले नष्ट करत पुढे ओसाड जमिनी म्हणून त्या लाटायच्या वा त्यावर अनधिकृत बांधकामे करायची असा विचार करत आगी लावल्या जात असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. दरम्यान, मागील 15 दिवसांत आगीच्या घटना खूपच वाढल्या असून ही चिंतेची बाब असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी संजय वल्सन यांनी दिली. कोणतीही संबंधित सरकारी यंत्रणा असे प्रकार रोखण्यासाठी पुढे येत नसल्याचे म्हणत यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आरे संरक्षित करावे

आरे जंगल वाचवणे ही गरज आहे. त्यामुळेच मेट्रो-3 कारशेडला जोरदार विरोध करत आदिवासी-पर्यावरण प्रेमींनी कारशेड आरेतून बाहेर नेण्यात यश मिळवले आहे. मात्र, सरकारकडून आरेत इतरही प्रकल्प जसे की प्राणी संग्रहालय, एसआरए योजना आणि अन्य प्रकल्प राबवणार आहे. त्यामुळे आरे जंगल नष्ट होणार असल्याने येथील प्रस्तावित सर्वच विकास प्रकल्पांना आदिवासी-पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. हे प्रकल्प रद्द करत संपूर्ण आरे जंगल घोषित करत आरेला संरक्षित करण्याची त्यांची मागणी आहे. यासाठी न्यायालयीन लढाही सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे जंगल संरक्षित करू, असे आश्वासन दिले आहे. त्यानुसार काही भाग संरक्षित केलाही आहे. पण, संपूर्ण आरे संरक्षित होणे बाकी आहे. अशात आता येथे आगी लावल्या जात असून हे आरे जंगलासाठी धोकादायक बाब आहे. या पार्श्वभूमीवर आता आम्ही लवकरच सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत. आगीच्या घटनांची माहिती देत त्यांना असे प्रकार रोखण्यासाठी साकडे घालणार आहोत. तर संपूर्ण आरे जंगल म्हणून घोषित करण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी करणार आहोत असे वल्सन यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details