महाराष्ट्र

maharashtra

'राजकारणामुळे एकाचवेळी चार मेट्रो मार्ग रखडण्यास जबाबदार कोण?'

By

Published : Dec 20, 2020, 1:30 PM IST

एकाच वेळी मुंबईतील चार मेट्रो मार्गा (मेट्रो 3, 6, 4 आणि 14)चे काम रखडले आहे. तेव्हा याला जबाबदार कोण, असा सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.

metro
metro

मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) मार्गाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण या स्थगितीमुळे आणि यावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे एकाच वेळी मुंबईतील चार मेट्रो मार्गा (मेट्रो 3, 6, 4 आणि 14)चे काम रखडले आहे. तेव्हा याला जबाबदार कोण, असा सवाल आता पर्यावरणप्रेमी आणि वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. तर यावरून आता त्यांनी भाजपाला ही टार्गेट' केले आहे.

फडणवीस सरकारनेच 2018मध्ये दिली होती परवानगी

कांजूर येथे मेट्रो हबमेट्रो 3साठी आरेऐवजी कांजूरच्या जागेचा पर्याय देण्यात आला होता. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारने आरेतच कारशेड करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली. कांजूरच्या जागेवर न्यायालयीन वाद आहेत, ती खासगी मालकाची जागा असून त्यासाठी 5000 कोटी द्यावे लागतील, असे अनेक मुद्दे पुढे करत ही जागा नाकारण्यात आली होती. मात्र याच जागेवर पुढे मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी)चे कारशेड बांधण्यास फडणवीस सरकारनेच 2018मध्ये परवानगी दिली. पुढे मेट्रो 14 (कांजूरमार्ग-बदलापूर) मार्गालाही मंजुरी मिळाली आणि याचे कारशेड ही याच ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे आरेला होणारा विरोध पाहता महाविकास आघाडीने आरेतून मेट्रो 3 कारशेड हलवत मेट्रो 6 आणि 14च्या कांजूर कारशेडच्या जागेवर हलवले. एकाच ठिकाणी 3 कारशेड होत असताना मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली)चे कारशेड या ठिकाणी करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)च्या माध्यमातून घेण्यात आला. एकाच ठिकाणी चार मार्गाचे कारशेड होणार असल्याने ही मोठी बाब ठरणार असून त्यामुळे भविष्यात कांजूरची ओळख 'मेट्रो हब' म्हणून होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मेट्रो हबमुळे 'असा' होणार फायदा

कांजूरच्या जागेवर एकाच वेळी चार मेट्रो मार्गाचे कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण एकाच ठिकाणी चार कारशेड होणार असल्याने इतर तीन ठिकाणच्या जागा वाचणार असून पर्यायाने झाडे आणि पर्यावरणाची हानी ही रोखली जाणार आहे. दुसरीकडे एकाच ठिकाणी एकाचवेळी काम होणार असल्याने मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि वेळ वाचणार आहे. परिणामी खर्चात मोठी बचत होणार आहे. कोट्यवधी रुपये वाचणार असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

'दोन वर्षे काय करत होते विरोधक?'

केवळ मेट्रो 3च्या कांजूरमधील कारशेडला विरोध करण्यासाठी फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी इतर तीन मेट्रो मार्गालाही ब्रेक लावला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुळात ज्या कांजूरच्या जागेवर मेट्रो 3चे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या जागेला खुद्द फडणवीस यांनीच मुख्यमंत्री म्हणून परवानगी दिली आहे. मेट्रो 6च्या कारशेडसाठी फडणवीस यांनी ही जागा दिली आहे. पण आता याच जागेवर मेट्रो 3 कारशेड आल्यानंतर फडणवीस यांनीच या जागेवर आक्षेप घेतला आहे. हे असे कसे हे सर्वसामान्यांच्या विचारापलीकडे असल्याचे म्हणत स्टॅलिन यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. तर 2018मध्ये आपणच कांजूरला परवानगी दिली, तेव्हा ही जागा केंद्राची आहे, खासगी बिल्डरची आहे, या जागेवर अनेक वाद आहेत याचा विसर पडला होता, की असे काही नव्हतेच. आता केवळ राजकारणासाठी असे खोटे मुद्दे उकरून काढले आहेत याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही स्टॅलिन यांनी केली आहे.

'सेव्ह आरे' बरोबरच आता इतर मेट्रो प्रकल्पासाठीही मैदानात

आरे जंगल वाचण्यासाठी सेव्ह आरेची हाक देत पर्यावरण प्रेमींनी कारशेड आरेतून बाहेर काढण्यास यश मिळवले आहे. पण आता कांजूरलाही विरोध होत आहे. त्यामुळे आरेतच कारशेड करण्याचा मुद्दा पुन्हा भाजपाकडून पुढे रेटला जात आहे. पण कोणत्याही परिस्थितीत कारशेड पुन्हा आरेत येऊ देणार नाही. सेव्ह आरे लढा सुरूच राहील गरज पडल्यास आणखी तीव्र होईल. पण त्याचवेळी आता मेट्रो 3, 6, 4 आणि 14 प्रकल्पही वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ राजकारणात हे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, विरोधक कशी मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत हे सर्व मुंबईकरांसमोर आम्ही मांडू असे स्टॅलिन यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details