मुंबई - "एलिफंटा महोत्सव २०१९" "स्वरंग'चा दिमाखदार उद्घाटन सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवारी पार पडला. यावेळी एलिफंटा महोत्सवाच्या तारखांच्या अनेकवेळा अडचणी येतात, त्या यायला नकोत. कार्यक्रम ठरल्यावेळीच व्हायला हवा, असे सांगत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाचे कान टोचले.
भाजप सरकारने एलिफंटा बेटावर ७० वर्षांनंतर वीज पोहचवून अंधार दूर केला. कोळी-आगरी संस्कृती सांभाळून या बेटाचा विकास सुरू असल्याचेही रावल यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जपान कौन्सिलेट जनरल मीचीयो ह्यारादासान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई ही मायानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर रात्रीही धावत असते. त्यामुळे पर्यटकांना त्याचे आकर्षण आहे. अशा या मुंबईत पर्यटकांचे पर्यटन महामंडळ स्वागत करत असते. पर्यटन विभागाकडून मुंबईपासून जवळच पर्यटकांसाठी क्रूझ टुरिझम सुरू केले आहे. नागपूरमध्ये संत्रा महोत्सव, कोकणात कोकण महोत्सव, तर मुंबईत मुंबई मेला या सारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती रावल यांनी दिली.