महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मला जरा वेळ द्या.. मी सहकार्य करेन, अनिल देशमुखांचे ईडीकडे आर्जव - सक्तवसुली संचलनालय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचा आरोप लावल्यानंतर देशमुख ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. आता या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देशमुख यांनी काही वेळ द्या, असे आर्जव ट्विटवर केले आहे.

cc
cc

By

Published : Jul 2, 2021, 8:20 PM IST

मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचा आरोप लावल्यानंतर देशमुख ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. आता या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देशमुख यांनी काही वेळ द्या, असे आर्जव ट्विटवर केले आहे.

या प्रकरणी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी दोनवेळा छापेमारी केली आहे. तसेच सीबीआय मोर अनिल देशमुख यांची एकदा चौकशी देखील झाली आहे. तर ईडीच्या छापेमारी दरम्यान अनिल देशमुख त्यांच्या वरळीतील निवासस्थानी स्वत: हजर देखील होते. दरम्यान याच प्रकरणात अनिल देशमुख यांना दोन वेळा ईडीने समन्स देखील पाठवला आहे. मात्र दोन्ही वेळेस अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित नव्हते. दरम्यान अनिल देशमुख यांनी मला वेळ द्यावा अशा आशयाचे ट्विट केलं आहे.

अनिल देशमुख यांनी केलेले ट्विट
सचिन वाझे प्रकरणात तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालकांना लिहले. या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले. ही वसुली मुंबईतील काही बारमधून केली जात असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला. दरम्यान याच प्रकरणात पुढे केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीचे फास अनिल देशमुख यांच्या भोवती आवळला. दरम्यान देशमुख यांना आपले गृहमंत्रीपद देखील गमवावे लागले होते. या प्रकरणातील अर्थिक गैरव्यवहाराचा तपास ईडी करत आहे. तपासादरम्यान ठोस पुरावे आढळल्याने अनिल देशमुख यांचे खासगी सचिव आणि पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केलीय. ही कारवाई ईडीनं 25 जून रोजी केली. सध्या दोघे अटकेत आहेत या दोघांनाही 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासादरम्यान या दोघांनी अनिल देशमुख यांचा गैरव्यवहारात हात असल्याचं कबुल केलं आहे. यामुळं अनिल देशमुख यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे
ईडीचे समन्स आणि अनिल देशमुखांचे ट्वीट -
आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना दोन वेळा समन्स बजावला आहे. मात्र दोन्ही वेळा अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात आपण चौकशीला का उपस्थित राहू शकत नाही. या संदर्भात देशमुख यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ''ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल.
विरोधीपक्ष आक्रमक -

राज्याच्या गृहमंत्रीपदी काम केलेले देशमुख तपास यंत्रणांना चौकशीला मदत करीत नाहीत हे चित्र दुर्दैवी आहे. ज्या पध्दतीचे ट्विट ते टाकत आहेत, त्यातून ते मदत करीत असल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात ते मदत करीत नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणांंनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ज्यावेळी ते स्वतः गृहमंत्री होते त्यावेळी एका चॅनलच्या संपादकांना अशी सवलत त्यांनी दिली होती का? लेखी प्रश्न पाठवून उत्तरे मागितली होती का? कोरोना पसरेल म्हणून चौकशीला येऊ नका, अशा सवलती तुम्ही त्यावेळी तुम्ही दिल्या होत्या का? असा सवाल ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक -

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षांकडून लावण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप सोबत जुळवून घ्यावं, या अशयाचं पत्र लिहलं होतं. यानंतर अनिल देशमुख यांनी आता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे येत्या अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा जोरदार गाजणार आहे. एकीकडे ईडीकडून देखमुख यांची चौकशी सुरु असताना उर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीत एक तक्रार दाखल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details