महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 29, 2021, 3:08 PM IST

ETV Bharat / city

Maharashtra Rain : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो धीर सोडू नका.. सरकार तुमच्या पाठिशी, आपत्तीतून बाहेर काढू - मुख्यमंत्री

गुलाब चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात पुराने हाहाःकार माजला आहे. अशातच धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav Thackeray
uddhav Thackeray

मुंबई - मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा, असे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला असून गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातील जिल्हे प्रभावित झाले आहेत.

ही अभूतपूर्व परिस्थिती, नुकसानीचे पंचनामे सुरू करा -

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे. शेतपिक वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा -नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले, आढावा बैठक घेणार असल्याची सामंत यांची माहिती



विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका -

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परिक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचवा, तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा -नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद; अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले -

यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतमाळमध्ये आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

एनडीआरएफ बचाव कार्यात -

एनडीआरएफचे १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचे हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करत आहे, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details