मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session 2022) आजचा ९ वा दिवस शेतकऱ्यांच्या वीज तोडणी (Farmers Electricity Cut) प्रकरणावरून गाजला. या प्रश्नावर सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. यामुळे दुपारपर्यंत चारवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, जोपर्यंत वीज तोडणी थांबवली जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही.
मध्यप्रदेश सरकारप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांचे पैसे भरावे-
आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्यावर दोन्ही बाजूचे सभासद एकवटले. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सभागृहात दोन्हीकडच्या आमदारांनी वीज कापली जात आहे त्याबाबत आवाज उठवला. काल सांगितले शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत आज चर्चा करू पण आज वेगळीच चर्चा उपस्थित केली गेली. आता तत्काळ वीज तोडणी थांबवा तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या प्रश्नावर मागील अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मे 2022 पर्यंत कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही असे आश्वासन दिले होते. त्याची आठवणसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात करून दिली. मध्यप्रदेश सरकारने ६५०० कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांचे विजेचे बिल भरले, त्या प्रमाणे राज्य सरकारनेसुद्धा वीज बिल भरावे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.