मुंबई-राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता, अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईमध्ये सांगितले.
पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजनची केंद्राकडून मागणी
राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत हेत असून, तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरण्यात येत आहे. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
केंद्र शासन 50 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार
केंद्र शासन देखील सुमारे ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार असून, त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे. राज्यात सहा ठिकाणं अशी आहेत, जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.