महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्यासाठी धारावीकरांची न्यायालयात धाव

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मागील 16 वर्ष धारावीकरांबरोबर खेळ सुरू आहे, हा खेळ थांबवा आणि धारावी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीने केली आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीच्या वतीने आता न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

By

Published : Nov 20, 2020, 6:10 PM IST

Demand for cancellation of Dharavi redevelopment project
धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची मागणी

मुंबई -धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मागील 16 वर्ष धारावीकरांबरोबर खेळ सुरू आहे, हा खेळ थांबवा आणि धारावी प्रकल्प रद्द करा अशी मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीने केली आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प समितीच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अ‌ॅड. राजू कोरडे यांनी दिली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची मागणी
मोर्चे, आंदोलनं, उपोषणं करूनही पदरी निराशा

धारावी पुनर्विकास प्रकल्प 2004मध्ये हाती घेण्यात आला होता. पण आज 16 वर्षे झाली तरी हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. या प्रकल्पासाठी तब्बल तीनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. पण एकदा ही निविदा मंजूर करण्यात आली नाही. आता तिसऱ्यांदा निविदा रद्द करत चौथ्यांदा निविदा काढली जाणार आहे. एकूणच निविदेतच ही प्रक्रिया रखडली आहे. तर दुसरीकडे धारावी प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आम्ही गेल्या 16 वर्षांत मोर्चे काढले, निदर्शने केली, उपोषणं केली. पण याचा काहीही फायदा झाला नाही. आम्ही 16 वर्षानंतरही पुनर्विकासाची प्रतीक्षाच करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राजू कोरडे यांनी व्यक्त केली.

म्हणून न्यायालयात जाणार

एखादा प्रकल्प 16 वर्षे मार्गी लागत नाही, साधी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, यावरूनच हा प्रकल्प मार्गी लावण्याची राजकीय इच्छाशक्तीच नाही हे स्पष्ट होते. त्यात आता तिसऱ्यांदा निविदा रद्द झाली आहे. आता बांधकाम क्षेत्राची आर्थिक स्थिती कोरोनामुळे बिकट झाली आहे. या आधी चांगली परिस्थिती असताना बिल्डर पुढे येत नव्हते, तर आता या कोरोनाकाळात कोण पुढे येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल असे आता वाटत नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत. त्यासाठी लवकच आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू, हा प्रकल्प रद्द झाल्यास ज्या पद्धतीने एखाद्या खासगी इमारतीचा पुनर्विकास होतो, त्याच प्रमाणे धारावीचा पुनर्विकास होऊ शकतो, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अ‌ॅड. राजू कोरडे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details