मुंबई- मॉब लिंचिंगविरोधात कायदा बनवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना असतानाही केंद्र सरकारने अद्याप हा कायदा बनवला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ बनवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
समाजमाध्यमावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालघर घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमिित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन विचारणा करण्याची तत्परता दाखवली. पण दोन वर्षांपासून भाजपचेच सरकार असतानाही मॉब लिचिंगविरोधातील कायदा त्यांच्या सरकारने का केला नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सावंत पुढे म्हणाले, की मॉब लिंचिंगच्या घटना इतर राज्यातही झाल्या. त्याही निंदनीयच होत्या, पण त्यावेळी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी अशी तत्परता दाखवल्याचे दिसले नाही. उलट काही प्रकरणातील आरोपींचा नंतर भाजपच्याच मंत्र्याने सत्कारही केला होता. यातून भाजप कोणता आदर्श समाजासमोर ठेवू इच्छित आहे, अशी विचारणाही सावंत यांनी करत भाजपच्या भूमिकेवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगूनही गेले दोन वर्षे केंद्र सरकारने मॉबलिंचिंग विरोधात कायदा बनवलेला नाही. जुलै २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने मॉब लिचिंगचा निषेध करत केंद्र सरकारला या घृणास्पद प्रकाराविरोधात कायदा बनवण्याचे निर्देश दिले होते. त्याबरोबरच ११ मार्गदर्शक सूचनाही केल्या होत्या. परंतु त्यावर केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर जुलै २०१९ साली पुन्हा तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने मॉब लिचिंगप्रकरणाची दखल घेऊन केंद्र सरकारला नोटीस पाठवून अगोदरच्या निर्देशाचे काय केले, याची विचारणा केली होती. असे असतानाही मोदी सरकारने काहीही केले नाही, याचे आश्चर्य वाटते. म्हणून हा कायदा तात्काळ करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
ज्या गडचिंचले गावात तिघांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली, त्या ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. चित्रा चौधरी ह्या सध्या तिथल्या सरपंच असल्याचा पुनरुच्चार सावंत यांनी केला. यासंदर्भातील अधिक कागदपत्रे व छायाचित्रे त्यांनी आज जाहीर केली. भाजप डहाणू मंडळाच्या अधिकृत फेसबुक प्रोफाईलवर गडचिंचले गावातील बुथ पदाधिकाऱ्यांची यादी घोषीत करण्यात आली होती. त्यातील पहिले दोन पदाधिकारी ईश्वर निकोले आणि भाऊ साठे हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलेल्या पालघरच्या गुन्हेगारांच्या यादीत अनुक्रमे ६१ व ६५ क्रमांकाचे आरोपी आहेत, असेही ते म्हणाले.
गडचिंचले गावात भाजपतर्फे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुराज्य पर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते. हा कार्यक्रम गडचिंचले गावात आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात भाजप सरपंच चित्रा चौधरी, भाजप मंडल अध्यक्षा संगिता कोटेला, हडाणू पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रामा ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. सदर कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी, फडणवीस, अमीत शाह, रावसाहेब दानवे यांच्या सुहास्यवदनाच्या असलेल्या फलकाच्या पार्श्वभूमिवर ज्यांचा सत्कार करण्यात आला, तो ईश्वर निकोले ही पालघर प्रकरणातील आरोपींच्या यादीत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय भाजपच्या इतर अनेक सदस्यांची नावेही पालघरच्या साधुंचे मारेकरी म्हणून आरोप असलेल्यांच्या यादीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे सत्य असल्याने या सर्व पदाधिकाऱ्यांवर त्यांनी केलेल्या साधूंच्या निर्घृण हत्येसंदर्भात सरकारतर्फे कठोर कारवाई, तर होईलच पण भाजपनेही त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.