महाराष्ट्र

maharashtra

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका - मुख्यमंत्री

By

Published : Jul 18, 2020, 8:40 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात टाळेबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे व रुग्णांना उपचारांची सुविधा मिळण्यासाठी करायला हवा.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई - जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी व आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात टाळेबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे व रुग्णांना उपचारांची सुविधा मिळण्यासाठी करायला हवा. परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी झाला पाहिजे.

मुख्यमंत्री म्हणाले की, टाळेबंदीत रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सूचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत. एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की सण साजरे करतांना नवे प्रतिबंधित क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीदेखील सूचना केल्या. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा व्यवस्थित असाव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी लेखापरीक्षक म्हणून अधिकारी नेमावेत. खर्च अव्वाच्या सव्वा लावणार नाहीत, हे कटाक्षाने पाहावे. विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार देणे बंधनकारक आहे.

राज्यात ५४० रुग्ण व्हेंटीलेटरवर

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ८० टक्के खाटा राखीव ठेवले आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटांची व्यवस्था करा. सध्या राज्यात ५ हजारपेक्षा जास्त व्हेंटीलेटर आहेत. मात्र केवळ ५४० रुग्णच व्हेंटीलेटरवर आहेत.

नोडल टेस्टिंग अधिकारी नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. २ हजार रुपये प्लाझ्मा दात्याला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकच कमांड सेंटर हवे

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले, की संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील शहरांमध्ये युनिफाईड कमांड सेंटर स्थापन करावे. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध सुविधांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल. २४ तासांत चाचणीचा अहवाल आलाच पाहिजे. रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेता वाहने अधिग्रहित करावीत. त्या वाहनांत तात्पुरते बदल करता येतील, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. मुंबईत मिशन सेव्ह ह्युमन लाईफ सुरू केले आहे.. तशीच कार्यवाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

ऑक्सिजन, रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित करा

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागातून ग्रामीण भागात वाढत चालला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. ऑक्सिजन, रुग्णसेवा वेळेवर मिळाली तर मृत्यू दर कमी होईल, असेही ते म्हणाले. या बैठकीला मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details