महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहीहंडी उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट, मुख्यमंत्र्यांची गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यंदा दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे.

दहीहंडी उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट,
दहीहंडी उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट,

By

Published : Aug 23, 2021, 9:24 AM IST

मुंबई- राज्यात कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तवला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलवली आहे. दहीहंडी उत्सवाला होणारी गर्दी, लहान मुलांमध्ये वाढू लागलेला कोरोनाचा प्रादुर्भाव यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

आरोग्य यंत्रणांचा धोक्याचा इशारा

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव बरोबर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. राजकीय, व्यावसायिक, उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांच्या हंडी लावण्यात येतात. गेल्या वर्षी कोरोना आला आणि दहीहंडी उत्सवाला ग्रहण लागले आहे. यंदा दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे.

आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावली. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होईल. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. पुढे येणारे सण आणि त्यावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. गोविंदा पथकांनी देखील दहीहंडी उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे बैठकीत करणार असल्याचे समजते. मात्र गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी हा निर्णय मान्य करतील का, हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती-

रविवारी (दि. 22 ऑगस्ट) राज्यात कोरोनाच्या 4141 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 145 मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात एकूण 4780 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढिचे प्रमाणे घटले असले तरी नवीन डेल्टा व्हेरियंट आणि गर्दी मुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता याचा विचार करून राज्य सरकार दहीहंडी उत्सवाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात 53,182 सक्रीय रुग्ण
राज्यात 4780 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 31 हजार 999 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 4141 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 145 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 962 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 24 हजार 651 (12.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 53 हजार 182 सक्रीय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details