महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागरिकांशी संवाद साधून दुष्काळी उपाययोजना राबवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

By

Published : May 15, 2019, 8:48 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला. दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.


गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. मंगळवारी नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉटसअप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नाले, विहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत करून नदी, नाला खोलीकरण, विहिरी व तलावातील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्ती अंतर्गत जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


वर्धा जिल्ह्यात आवश्यकता असेल तेथे, विंधण विहिरींचे अधिग्रहण करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जुन्या पाणी पुरवठा योजनांना पाईपलाईन करणे, विशेष दुरुस्तीमधील कामे पूर्ण करणे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.


ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना ‍मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबित पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, रोहयोची कामे, अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


जेथे गरज असेल, तिथे रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2018 ची लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणी पुरवठा वाढविण्यात यावा. टंचाईसंदर्भात तातडीच्या बाबींवर 48 तासांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details