मुंबई- बंडखोरी करणाऱ्यांना युतीत स्धान असणार नाही. तसेच दोन दिवसात बंडखोरी करणाऱ्यांना उमेदवारी मागे घेण्यास लावू, तसेच राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महायुतीची संयुक्त युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
तिकीट कापले म्हणणे योग्य नाही, जबाबदारी बदलली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यावर त्यांची जबाबदारी बदलली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
युती होईल का? इतरांच्या मनात प्रश्न होता पण आमच्या मनात हा प्रश्न कधीच नव्हता. एकत्र रहायचे असेल तर तडजोड करावी लागते व त्यामुळेच महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुंबईतून आदित्य ठाकरे सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु पण तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने लढेल, असेही त्यांनी सांगितले.