महाराष्ट्र

maharashtra

कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद

By

Published : Mar 16, 2020, 3:56 PM IST

राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली स्थगित करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंत्रालयातील सर्वसामान्य जनतेस प्रवेशबंदी आणि बायोमेट्रिक प्रणाली स्थगित करून तुर्तास पारंपरिक हजेरी पटाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवावी, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

Citizens access to ministry is blocked in the wake of Corona
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मंत्रालयात प्रवेश बंद

मुंबई - राज्यामधील कोरोनाग्रस्तांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अधिक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालयात सर्वसामान्य जनतेसाठी पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली स्थगित करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंत्रालयातील सर्वसामान्य जनतेस प्रवेशबंदी आणि बायोमेट्रिक प्रणाली स्थगित करून तुर्तास पारंपरिक हजेरी पटाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवावी, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा...'कोरोना' संदर्भात अफवा पसरवणे पडले महागात, पुण्यात एकावर गुन्हा दाखल

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईमध्ये तीन, तर नवी मुंबईमध्ये एक नवीन रुग्ण अढळून आल्याने रविवारी ३३ असणारी रुग्णांची संख्या सोमवारी ३७ वर पोहोचली. याच पार्श्वभूमीवर सरकार आणखीन काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. गर्दीने प्रवास केला जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांमधील प्रवासी संख्या कमी करण्यासंदर्भातील चर्चाही झाल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट तसेच लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासंदर्भातील महत्वाचे निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा...कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची भीती: शेअर बाजारात २,१२५ अंशांनी घसरण

मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 'आपण बऱ्यापैकी शटडाऊन केले आहे. मात्र, इतरही काही निर्णय घेणे आवश्यक आहे. नुकतीच आरोग्य विभागाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद करावीत आणि त्यांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्यात, असे मत नोंदवले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये उभे राहून रेटारेटी करत प्रवास करणारी गर्दी असते, ती कमी करण्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचीही चर्चा या बैठकीमध्ये झाली' असे टोपे यांनी स्पष्ट केले.

खासगी कंपन्यांनाही बंद करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा, अशा अनेक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच आरोग्य विभागाला लागणाऱ्या आवश्यक बाबी उपलब्ध आहेत का, नवीन काही आदेश द्यावे लागतील का, याचाही आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव, संचालक आणि राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर असे सर्वचजण उपस्थित होते. सर्व गोष्टींसाठी आरोग्य खाते तयार आहे. नवीन आदेश वेळोवेळी दिले जात आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

हेही वाचा...जाणून घ्या जगभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडी...

राज्यामधील कोरोनाग्रस्तांची संख्या चारने वाढल्याची माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सर्व कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. 'राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. नवीन रुग्ण हे कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबातीलच व्यक्ती आहेत. कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कात येणाऱ्या म्हणजेच हाय रिस्क कॉनटॅक्टमधील हे नवे रुग्ण आहेत. दोन जण थेट कुटुंबातील आहेत, तर दोघे परदेशातून प्रवास करून आले आहेत', अशी माहिती टोपे यांनी दिली. 'विलगीकरण कक्षामध्ये लक्षणे असलेले किंवा परदेशात फिरून आलेल्या लोकांना ठेवले जाते. पनवेलमध्ये अशा ३३ लोकांना ठेवण्यात आले आहे' असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details