मुंबई- मुंबईमध्ये अनेक विकास कामे सुरू असून त्यामध्ये विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी मुलुंड पूर्व आणि भांडुप पश्चिम येथे घरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानंतर आता वरळीत प्रकल्पग्रस्तांसाठी ५२९ घरे बांधली जाणार आहेत. पालिका ( BMC ) प्रत्येक घराच्या बांधकामासाठी ८५ ते ९० लाख रुपये खर्च करणार असल्याने कंत्राटदाराला सुमारे ५५० कोटी रुपये मोजणार आहे.
३५ हजार घरे बांधणार -प्रकल्पग्रस्तांसाठी पालिकेने घरांची योजना आखली आहे. यापूर्वी मुलुंड पूर्व आणि भांडुप पश्चिम येथील प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आता वरळीत प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधली जाणार आहे. पालिकेच्या सात परिमंडळात प्रत्येकी पाच हजार घरे उभारली जाणार आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी एकूण ३५ हजार घरे बांधणीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मागील आठवड्यात सुधार समितीच्या बैठकीत मुलुंड आणि भांडुपमधील साडेनऊ हजार घरांचा सुमारे ३५०० कोटींचा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आला. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला होता. त्यानंतर आता वरळी येथे घरे बांधण्यासाठी क्लासिक प्रमोटर्स या एकमेव बिल्डरची निविदा आली होती. त्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.