महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आम्हाला विचारून रुग्णालयात दाखल केले का? आरोग्य समिती अध्यक्षांनी पालकांना दरडावले

महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी पीडित पालकांसमोर वादग्रस्त विधान केले. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत.

By

Published : Dec 23, 2021, 8:42 PM IST

Rajul Patel Controversial statement in front of parents
आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल वादग्रस्त विधान

मुंबई -महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी पीडित पालकांसमोर वादग्रस्त विधान केले. त्यामुळे, पालक संतप्त झाले आहेत.

माहिती देताना पालक आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -Vanchit Bahujan Aghadi Morcha : ओबीसी आरक्षणासाठी 'वंचित'चा विधान भवनावर मोर्चा

सावित्रीबाई फुले रुग्णालयाला भेट दिल्यानंतर राजुल पटेल यांनी, तुम्ही आम्हाला विचारून आपल्या मुलांना रुग्णालयात दाखल केले का? असे म्हणत पालकांना दरडावले आहे. पीडित पालकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता राजुल पटेल यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सदर विधान केले. त्यांच्या या कृत्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.

गोरेगावच्या प्रमोद मोरे यांच्या नवजात शिशूला भांडुपच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील एनआयसीयू मध्ये 15 तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल अचानक त्यांच्या नवजात शिशूची प्रकृती बिघडली असल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान हे बालक दगावले. डॉक्टरांनी जर वेळीच माहिती दिली असती तर, कदाचित आम्ही आमच्या बाळाला वाचवू शकलो असतो आणि इतरही मुलांना वाचवू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया प्रमोद मोरे यांनी दिली.

निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा मृत्यू - प्रभाकर शिंदे

रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा सेप्टिक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू ( नवजात शिशू अतिदक्षता विभाग ) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.

भाजपने भांडुप पोलिसांत केली तक्रार

गेल्या चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गंभीर असून या संदर्भात संबंधित दोषी व्यक्तींविरोधात कारवाई व्हावी यासाठी भांडुप पोलिसात भाजपने तक्रार देखील दखल केली आहे.

हेही वाचा -Kangana Ranaut : कंगना खार पोलीस ठाण्यात हजर, जबाब नोंदवणार

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details