नागपूर - अंधेरी पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची ( Andheri East Constituency Election Unopposed ) अपडेट आहे. भारतीय जनता पक्षाने माघार घेतली ( BJP decision on Andheri byelection ) आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ( BJP State President Bawankule ) यांनी नागपुरात घोषणा केली आहे. मतदार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने उमेदवार मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाची माघार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला भाजपने साद दिली आहे. ही निवडणूक आम्ही 100 टक्के जिंकली असती, एक दीड वर्षासाठी निवडणूक होत असल्याने माघार घेतली आहे. आमदाराचे निधन होते. तेव्हा निवडणूक न लढवणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा संस्कृतीचा भाग आहे. दीड वर्षाकरिता निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही शीर्ष नेतृत्वाने हा निर्णय घेतला. आम्ही पळकुटे नाहीत, हा आरोप चुकीचा आहे. अंधेरी मध्ये २०२४ मध्ये आम्ही आपली क्षमता सिद्ध करू. 51 टक्के मतांसह आमचा विजय निश्चित होता. केवळ राजकीय संस्कृती लक्षात घेता लटके यांना बिनविरोध केल्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे नेहमीच चांगला सल्ला देतात. हा निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
आम्ही पळकुटे नाही-अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्ष माघार घेत असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली आहे. कोणत्याही पक्षाच्या आमदारचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणताही पक्ष आपला उमेदवार उभा करत नाही ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्याच परंपरेला अनुसरून आज भाजपने निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेला असल्याची माहिती त्यांनी दिली. अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून आमच्या पक्षाने आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. हा आमचा पळकुटेपणा नाही. केवळ राजकीय संस्कृती कायम राहावी केवळ याकरिता हा निर्णय घेतला आहे. मात्र,2024 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजप आपली क्षमता सिद्ध करून दाखवेल असे देखील ते म्हणाले आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे शरद पवारांनी केले होते आवाहनअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध ( Andheri East Constituency Election Unopposed ) व्हावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( NCP senior leader Sharad Pawar ) यांनी नुकतेच केले . आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांचं निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. दीड वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत असून, एवढ्या कमी कालावधीसाठी ही निवडणूक होऊ नये. ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला संदेश जाईल असेही मत शरद पवार यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकाराशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांची घेतली होती बैठक-अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध देत भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार मागे घ्यावा का? या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल हे उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र पत्रात राज ठाकरेंनी म्हटले, की दिवंगत आमदार रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. शाखाप्रमुख पदापासून शिवसेनेत त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. ते आमदार पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या राजकीय प्रवासाचे आपण स्वतः साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार झाल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल. अशा परिस्थितीत आपण आपल्या पक्षाकडून निवडणूक न लढवण्याची भूमिका घेत असतो. असं केल्यास दिवंगत लोकप्रतिनिधीच्या आत्म्याला आपल्याकडून श्रद्धांजली वाहिली जाते अशी आपली भावना आहे. आपणही तसं करावं. ही महाराष्ट्राची महान संस्कृती आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
माझ्यावर कुठलाही दबाव नाही, मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही - मुरजी पटेल :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अतिशय चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. याविषयी बोलताना मुरजी पटेल यांनी, माझ्यावर कुठलाही दबाव नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे, असे सांगितले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत खर्च होणारी ऊर्जा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठेवा तिथे आपण तिचा सदुपयोग करू, असं मुंबई भाजप, अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे गटाने मानले भाजपचे आभार -अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी भाजपाने मागे घेतली आहे. भाजपाने जो काही सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे
भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेने मानले आभार -भारतीय जनता पक्षाने आता अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. अखेर आज भाजपने आपले अधिकृत उमेदवार मुर्जी पटेल यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आभार मानले आहेत.