मुंबई - कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर संपूर्ण किनारपट्टी सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अशिष शेलार यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाचा आढावा घेतला. यावेळी धक्कादायक चित्र समोर आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महापालिका कक्ष कोरोनाचे काम करत आहे. मात्र वादळाची कोणतीही तयारी, सूचना, अथवा यंत्रणा सतर्क नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
'पालिका कर्मचारी कोरोनाच्या व्यवस्थापनात व्यग्र; वादळासंबंधी कोणतीही खबरदारी नाही' - indian meteorology department
कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर संपूर्ण किनारपट्टी सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अशिष शेलार यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाचा आढावा घेतला.

निसर्ग वादळ रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमनच्या पट्ट्यातून वळण्याची शक्यता आहे. ही क्रिया ३ जूनला संध्याकाळी किंवा रात्री होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे मुंबई आणि या पट्ट्यातील शहरांना वादळाचा तडाखा बसणं अपेक्षित आहे. या वादळामुळे नुकसान टाळण्यासाठी विविध पातळीवर यंत्रणा कार्यरत आहेत. मुंबईसह किनारी भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मात्र मुंबई पालिकेची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप अशिष शेलार यांनी केलाय. पालिकेच्या नियंत्रण कक्षात देखील कोणत्याही प्रकारचे काम सुरू नसल्याचे ते म्हणाले. भाजप आमदार शेलार यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यानंतर पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने त्वरित याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.