सुशांतसिंह प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपची राज्यपालांकडे तक्रार - मुंबई राज्यपाल बातमी
भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली.

मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या शिष्ट मंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे तातडीने उघडण्याची आज पुन्हा मागणी केली. ५ ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली असावीत असा आग्रह या शिष्टमंडळाने धरला. भाजपच्या या मागणीवर राज्यपाल महोदयांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती लोढा यांनी दिली.
भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी राज्यपालांकडे केली आहे, असे देखील मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
भाजप आमदारांच्या शिष्टमंडळात आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार मंगलप्रभात लोढा, भाई गिरकर, योगेश सागर, कालिदास कोळंबकर, सुनील राणे, मानिषाताई चौधरी, राहुल नार्वेकर, मिहीर कोटेचा, पराग शाह हे उपस्थित होते.