महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकविणार'

येत्या निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी जी वचने दिली ती पूर्ण केलेली नाहीत हे जनतेसमोर नेवून येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा झेंडा फडकवू, असा विश्वास भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

By

Published : Feb 23, 2021, 7:13 PM IST

Updated : Feb 23, 2021, 7:34 PM IST

मुंबई भाजपा
मुंबई भाजपा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात सत्ताधाऱ्यांनी आपल्या वाचनाम्याद्वारे अनेक वचने मुंबईकरांना दिली मात्र ती पूर्ण झालेली नाहीत. याची आठवण करून देण्यासाठी भाजपाकडून निदर्शने करण्यात आली. येत्या निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी जी वचने दिली ती पूर्ण केलेली नाहीत हे जनतेसमोर नेवून येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा झेंडा फडकवू, असा विश्वास भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

महापालिका मुख्यालयासमोर मूक निदर्शने

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन आज चार वर्ष पूर्ण झाली. याचे औचित्य साधून मुंबई महापालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयासमोर मूक निदर्शने केली. यावेळी शिंदे ईटीव्ही भारतशी बोलत होते. यावेळी मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना भाजपाही त्यांचा मित्रपक्ष होता, भाजपाही सत्तेत सहभागी होता. याबाबत विचारले असता, भाजपा सत्तेत सहभागी असला तरी गेल्या चार वर्षात निर्णय घेणारी सर्व पदे आणि अधिकार शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे गेल्या २५ वर्षात सत्ताधाऱ्यांनी काय केले त्याचे मुंबईकरांना प्रगती पुस्तक दाखवावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे, निर्णय क्षमतेत जो अडसर आला आहे ते आम्ही मुंबईकरांसमोर घेऊन जाणार आहोत. असे सांगत येत्या निवडणुकीत महापालिकेवर भाजपाचा भगावा फडकवू, असे शिंदे म्हणाले.

'मुंबईची तुंबई'

सन १९९६ ते २०२१ अशी सलग २५ वर्षे मुंबई महापालिकेत महापौरपदी शिवसेना विराजमान आहे. या काळात पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, सातशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता करात सवलत, खड्डे विरहीत रस्ते, तुंबई मुक्त मुंबई, २४ × ७ तास पिण्याचे पाणी, दर्जेदार रुग्णालये, बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, डबेवाला भवन, मराठी शाळा दर्जोन्नती, मराठी भाषा विभाग अशा अनेक आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांमध्ये 'जे बोलतो ते करतो' असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, तब्बल २५ वर्ष उलटूनही मुंबईकरांच्या हाल-अपेष्टा संपलेल्या नाहीत. मात्र याचवेळी धनदांडग्यावर करामध्ये सवलतींचा वर्षाव करत महापालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. २६ जुलै २००५च्या महापुरानंतर १६ वर्षांत वीस हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपये पुरनियंत्रणासाठी खर्च केल्यानंतरही व दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होते. सर्वसामान्य मुंबईकराच्या भावनेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकर जनताच धडा शिकवेल अशी सडकून टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केली. या मूक आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, अभिजित सामंत, अतुल शाह, नगरसेविका शितल गंभीर–देसाई, समिता कांबळे, नेहल शाह, कृष्णावेनी रेड्डी, सुरेखा लोखंडे, व अन्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

Last Updated : Feb 23, 2021, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details