महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2YearsOfMahaVikasAghadi : पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे सरकार असल्याची आशिष शेलारांची टीका - महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे पूर्ण

महाविकास आघाडी सरकार(MahaVikasAghadi) म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्यासाठी चालवलेलं सरकार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण(2YearsOfMahaVikasAghadi) झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही टीका केली आहे.

bjp leader ashish shelar
bjp leader ashish shelar

By

Published : Nov 28, 2021, 2:51 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकार(MahaVikasAghadi) म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्यासाठी चालवलेलं सरकार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण(2YearsOfMahaVikasAghadi) झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही टीका केली आहे.

राज्य सरकारवर टीका

महाविकास आघाडी सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र हे सरकार केवळ पुत्र, पुत्री आणि पुतण्या भोवती फिरणार सरकार आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून एकही काम केलेलं नाही. केवळ पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांना खूश करण्यासाठी हे सरकार चालवलं अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच ज्याप्रमाणे 'तीन पैशांचा तमाशा' हे प्रसिद्ध नाटक आहे. त्याचप्रमाणे राज्यात तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे. केवळ सत्ता आणि संपत्ती मिळविण्यासाठी हा तमाशा सुरू असून केवळ सत्तेचा लोभ या सरकारला आहे. सामान्य माणसाची कोणतीही जाणीव या सरकारमध्ये नाही असेही यावेळी आशिष शेलार म्हणाले.

पब, पेग पेंग्विन

आपला पुत्र मोठा व्हावा, त्याने चांगलं काम करावं हे प्रत्यक पित्याला वाटणं यात काहीही चूक नाही. मात्र त्यासाठी महाराष्ट्रात काय निर्माण झाले. केवळ पार्टी, पब, पेग आणि पेंग्विन अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाल्याचा टोमणा आशिष शेलार यांनी लगावला. उपनगरीय रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असताना, राज्य सरकार पंप सुरू करत होतं. मंदिर उघडण्याऐवजी मदिरालय उघडण्यात आली. त्यामुळे हे सरकार राज्यातील जनतेचा विचार करते का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.

गृहमंत्र्यांच्या नियुक्तीवरून टीका

केवळ सुपुत्रीच्या आग्रहामुळे अनिल देशमुखांसारख्या व्यक्तीला राज्याच्या गृहमंत्री पदावर बसवावे लागले. त्यामुळे महाराष्ट्राची नाहक बदनामी झाली. तर पुतण्याने एक हजार कोटींची बेनामी संपत्ती जमवली. साखर कारखाना तोट्यात दाखवून स्वतः खरेदी केला. शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीकाही त्यांनी केली.

अतर्क, असंवेदनशील आणि अहंकारी सरकार
अतर्क, असंवेदनशील आणि अहंकारी अशा तीन पद्धतीने या सरकारने राज्याचा कारभार हाकला. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी केली. मात्र राज्य सरकारने इंधन दराबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. वायनरीला सरकार सबसिडी देते, मात्र शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही. एसटी संपाबाबत तोडगा नाही. शाळा बंद, पण शाळेच्या फीमध्ये वाढ, असे राज्य सरकारचे निर्णय अतर्क आहेत. तर राज्य सरकारने घेतलेले काही निर्णय हे कायद्यात बसत नाही. घेतलेल्या निर्णयांना न्यायालयांत आव्हान दिल्यानंतर न्यायालय देखील राज्य सरकारला फटकारते. म्हणजेच शासनामध्ये संवेदनशीलता नाही. तसेच काही बाबतीत केवळ सत्तेचा अहंकार या राज्य सरकार मध्ये दिसत असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

आरक्षणाचा खेळखंडोबा
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना मराठा समाजाला तत्कालीन राज्य सरकारने आरक्षण दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार ते आरक्षण न्यायालयात टिकू न शकल्याने मराठा समाजाचे हातचे आरक्षण गेले. तसेच ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाबाबत देखील आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी समाजाला फटका बसली असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

राज्यात महिला असुरक्षित
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यात महिला असुरक्षित आहे. महिला सुरक्षेसाठी "शक्ती कायदा" काढण्याचे आश्वासन केवळ राज्य सरकारकडून देण्यात आले. मात्र या कायद्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. राज्यभरात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे यावेळी शेलार म्हणाले.

'जो पाप करतो त्यालाच भीती वाटते!'
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचं सांगत आहेत. मात्र त्यांचा जर कोणी पाठलाग करत असेल तर त्यांना भीती वाटायचं कारण नाही. कारण जे पाप करतात त्यांनाच भीती वाटते अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर केली.

प्रदेशाध्यक्षबदली बाबत कोणतीही चर्चा नाही
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बाबत दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत कोणतीही चर्चा महाराष्ट्रात किंवा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मध्ये झालेली नाही. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या कामावर दिल्लीतील ज्येष्ठ नेते समाधानी असून प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षामध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांच्याकडून देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details