मुंबई - कांजूरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊन त्याचा फटका मुंबईकरांना बसू नये यासाठी मेट्रो - 3 ची कार शेड आता वांद्रे कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का, या पर्यायाची चाचपणी राज्य सरकार गांभीर्याने करत असल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचा हा 'रडीचा डाव' असल्याची टीका केली आहे. तो 'मुंबईच्या विकासाच्या नरडीचा घाव घेणारा ठरेल', असे ते म्हणाले.
काजूरमार्ग मेट्रो कारशेड : 'हा तर शिवसेनेचा रडीचा डाव' - ashish shelar on metro project
कांजूरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. सध्या या जागेसाठी बीकेसीतील भूखंडाचा पर्याय राज्य सरकार तपासून पाहात आहे. मात्र यावर भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे.
![काजूरमार्ग मेट्रो कारशेड : 'हा तर शिवसेनेचा रडीचा डाव' ashish shelar news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9920727-thumbnail-3x2-shelar.jpeg)
विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!
मेट्रो कारशेड बीकेसीत प्रस्तावित करणे म्हणजे शिवसेनेचा रडीचा डाव खेळत आहे. तो मुंबईच्या विकासाच्या नरडीचा घाव घेणारा ठरेल, असे शेलार म्हणाले. मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला देखील विरोध करण्यात आला. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करत आहात. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव आखला जातोय, असे शेलार म्हणाले.
हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला,असे ते म्हणाले. हे विरोधक नव्हे, हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक आहेत, अशी टीका शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.