मुंबई : सोमवारी काँग्रेसचा १३६वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कारभार भाई जगताप यांनी अधिकृतरित्या स्वीकारला. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा भाई जगताप यांनी केली.
महापालिका निवडणूक हे सर्वात मोठं आव्हान..
माझी नियुक्ती ही एका वर्षासाठी नाही, तर पाच वर्षांसाठी झाली आहे. या कार्यकाळातील सर्वात पहिलं मोठं आव्हान हे मुंबई महापालिका निवडणूक आहे. येत्या वर्षभरात आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात काम करु. जेणेकरुन महापालिका निवडणुकीचे हे आव्हान आम्हाला यशस्वीरित्या पेलता येईल, असे भाई जगताप यावेळी म्हणाले.
आघाडी सरकारमध्ये जसं होतं, तसंच महाविकासआघाडी सरकारमध्ये राहील..
गेल्या १५ वर्षांपासून आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि काही इतर पक्ष अशी आमची आघाडी होतीच. मात्र १५ वर्षांमध्ये तीनही वेळा आम्ही २२७ जागा लढवल्याच. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येही आम्ही २२७ जागाच लढवणार आहोत. ही माझी एकट्याचीच नाही, तर पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे.
काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास..
काँग्रेसचा महापौर होईल का? असे विचारले असता, कार्यकर्त्यांनी मुंबईचा महापौर होण्याची आशा बाळगणं यात काहीही गैर नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जेवढं काम केलं आहे, जेवढी मेहनत केली आहे ती पाहता त्यांची ही आशा सत्यात उतरेल असा मलाही विश्वास वाटतो, असे मत भाई जगताप यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकारवर परिणाम नाही..
मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर जरी झाला, तरी याचा राज्य सरकारवर काही परिणाम होणार नाही. मी केवळ मुंबईपुरता विचार करतो आहे, आणि प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करायचा हक्क आहेच. त्यामुळे यामुळे राज्य सरकारवर काही परिणाम होईल असे वाटत नसल्याचे भाई जगताप यांनी स्पष्ट केले.