महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टच..! बंद संपताच बेस्टने 1 हजार 833 बसेस रस्त्यावर उतरवल्या

बंद दरम्यान बेस्टच्या 11 बसची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. तसेच, दिवसभर बसेस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वा दोन कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, हा बंद संपताच बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांच्या सोयीसाठी 1 हजार 833 बसेस रस्त्यावर उतरवल्या असून यामुळे सकाळी बस सेवा बंद असल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

By

Published : Oct 11, 2021, 9:21 PM IST

best launched buses after maharashtra bandh
बेस्टने बसेस रस्त्यावर उतरवल्या

मुंबई - लखीमपूर हत्याकांड, महागाई विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान बेस्टच्या 11 बसची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली आहे. तसेच, दिवसभर बसेस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वा दोन कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, हा बंद संपताच बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांच्या सोयीसाठी 1 हजार 833 बसेस रस्त्यावर उतरवल्या असून यामुळे सकाळी बस सेवा बंद असल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रावर वीज टंचाईचे संकट.. राज्याला कोळसा न देण्याचा केंद्र सरकारचा डाव, काँग्रेसचा आरोप

11 बसेसची तोडफोड

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच धारावी, शिवाजी नगर, मालवणी आदी ठिकाणी बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. यामुळे बेस्टच्या 11 बसेसचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने बस सेवा सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली होती. पोलिसांकडून सुरक्षा मिळताच बेस्ट सेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले होते.

1 हजार 833 बसेस रस्त्यावर

बेस्टच्या बसेसची तोडफोड झाल्याने बहुतेक बसेस डेपोमध्ये उभ्या होत्या. सकाळच्या गर्दीच्या वेळी बस सेवा तुरळक सुरू असल्याने मुंबईकर नागरिकांचे हाल झाले होते. सायंकाळी 4 वाजल्यानंतर बंदची वेळ संपुष्टात आल्यावर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ताफ्यातील एकूण 3 हजार बसेसपैकी 1 हजार 833 बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या. यामुळे सकाळी बसने प्रवास करता न आलेल्या प्रवाशांना सायंकाळी काही प्रमाणात दिलासा मिळाला.

सरकारने नुकसान भरपाई द्यावी

बेस्ट तोट्यात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बंद दरम्यान बेस्टच्या आज 8 बसेसची तोडफोड झाली आहे. मुंबईत बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यामाध्यमातून बसवर दगडफेक करणाऱ्या लोकांचा सरकारने आणि पोलिसांनी शोध घ्यावा. त्यांना पकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच, बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीमधून दिवसाला सुमारे सव्वा दोन कोटींचे उत्पन्न मिळते. आज बंदमुळे दिवसभर बस डेपो बाहेर निघाल्या नसल्याने बेस्टचे दिवसभर मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. यामुळे ही सर्व नुकसान भरपाई बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांनी भरून द्यावी, अशी मागणी भाजपचे बेस्ट समितीतील सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.

हेही वाचा -आघाडी सरकारने प्रथम केंद्राचे काळे कायदे रद्द करावे - प्रकाश रेड्डी

ABOUT THE AUTHOR

...view details