महाराष्ट्र

maharashtra

Best Bus Mumbai : प्रवाशांना आजही करावा लागतो बेस्टच्या जुन्या बसमधून प्रवास; 'हे' आहे कारण

By

Published : Oct 18, 2022, 10:07 PM IST

बेस्टने आपला खर्च कमी करण्यासाठी खासगी कंत्राटीपद्धतीच्या एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. तरीही बेस्टच्या स्वतःच्या १३०० बसेसचा ताफा आहे. त्यापैकी बहुसंख्य बसेस १० वर्षाहून जुन्या आहेत. या बसेसमधून आजही प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आतापर्यंत ५ हजार कोटी रुपयांहुन अधिकची मदत केली आहे. त्यानंतर अद्याप बेस्ट आर्थिक अडचणीतून बाहेर पडलेली नाही. बेस्टने आपला खर्च कमी करण्यासाठी खासगी कंत्राटीपद्धतीच्या एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. तरीही बेस्टच्या स्वतःच्या १३०० बसेसचा ताफा आहे. त्यापैकी बहुसंख्य बसेस १० वर्षाहून जुन्या आहेत. या बसेसमधून आजही प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

बेस्ट आर्थिक संकटात -बेस्ट उपक्रमाकडे काही वर्षांपूर्वी स्वतःच्या मालकीच्या ४ हजाराहून अधिक बसेसचा ताफा होता. बससाठी लागणारे डिझेल आणि त्यावर होणार परिरक्षणाचा खर्च मोठा होता. यामुळे बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग आर्थिक अडचणीत आला. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने बँकांकडून कर्ज घेतले. मात्र नंतर बँकांनी कर्ज देणे बंद केले. यामुळे पालिकेने बेस्टला १६०० कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड बेस्टने केली. या दरम्यान बेस्टवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने कृती आराखडा बनवून दिला. त्यात बेस्टच्या बसेस खासगी कंत्राटदाराकडून चालवण्याचा सल्ला देण्यात आला. यानुसार बेस्टने आपला बसचा ताफा कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेस्टने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात २२३६ कोटींची तूट दाखवली आहे. बेस्टला एकूण ९ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे. पालिकेने २०१५ पासून आतापर्यंत बेस्टला ५३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

जुन्या १३०० बसेस -सध्या बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या १३०० बस आहेत. या बसेस १० वर्ष जुन्या आहेत. या बसेस आजही रस्त्यावर धावत आहेत. या बसेस जुन्या झाली आहेत. अशा या जुन्या बसेसमधून प्रवाशांना त्रासदायक प्रवास आजही करावा लागत आहे. बेस्टने प्रवाशांना चांगली सेवा देता यावी म्हणून खासगी कंत्राटदाराकडून १८४० एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. बेस्टने स्वता ४०६ इलेक्ट्रिक बसेस विकत घेतल्या आहेत. भाडेतत्वावरील एसी बसेसमुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायक प्रवास करायला मिळत आहे.

एसी इलेक्ट्रिक बसवर भर -बेस्ट उपक्रमाने आपला खर्च कमी करण्यासाठी प्रति किलोमीटर ४० ते ८० रुपये दराने एसी बसेस भाडे तत्वावर घेतली आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील १८४० बसेस चालवल्या जात आहेत. मुंबई हे मेट्रोपॉलिटन शहर असल्याने १५ वषे पूर्ण झालेली जड वाहने नियमानुसार चालवता येत नाही. बेस्ट अशा १५ वर्षे पूर्ण झालेल्या बसेस भंगारात काढते. २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफयातील सर्व १३०० बसेस काढून त्या जागी एसी बस चालवल्या जाणार आहेत. २०२७ पर्यंत बेस्टचा १०० टक्के एसी इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असणार आहे अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

एसी बसमुळे प्रवासी व बेस्ट दोघांना फायदा -बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी बसेस आणल्या आहेत. प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टप्याटप्याने बेस्ट आपला स्वतःच्या मालकीचा ताफा कमी करत आहे. त्याजागी प्रवाशांना एसी आरामदायक बसेस उपलब्ध करून देत आहे. यामुळे प्रवाशी संख्या वाढण्यासाठी आणि बेस्टचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया बेस्टचे माजी सदस्य व माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे. बेस्ट उपक्रम सतत पालिकेच्या जीवावर जगणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत बेस्स्टकडे ३२० एकरची जागा आहे. या जागांचा विकास करून बेस्टने जी तूट आहे ती तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या जागांचा विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी सूचना रवी राजा यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details