महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2020, 5:36 PM IST

ETV Bharat / city

'कोरोनाच्या लढाईत राज्य सरकार अपयशी, रुग्णांना बेडही मिळेनात'

राज्यातली स्थिती अतिशय विदारक होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळणंही मुश्किल झाले आहे. खासगी हॉस्पिटलवर सरकारचा अंकुश राहिला नाही. खासगी हॉस्पिटलमधील बेड केवळ कागदावरच राहिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई - कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्याचे खापर सरकारने केंद्र सरकारवर फोडू नये, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. राज्यातली स्तिथी अतिशय विदारक होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळणंही मुश्किल झाले आहे. खासगी हॉस्पिटलवर सरकारचा अंकुश राहिला नाही. खासगी हॉस्पिटलमधील बेड केवळ कागदावरच राहिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोनाच्या लढाईत मदत केली आहे. तरीही केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला 75 हजार कोटीच्या कर्जासाठी परवानगी दिली आहे. तसेच जीएसटी कराची थकबाकी ही अदा केली आहे. सुरुवातीला देशात एकही पीपीई किट तयार होत नव्हते. आज दिवसाला 3 लाख किट तयार होत आहेत. देशात कोविडच्या 610 प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. राज्याची 35 हजार टेस्टिंगची क्षमता आहे. मात्र, केवळ राज्यात 15 हजार टेस्ट होत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट बंद केली आहे. या टेस्ट पुन्हा सुरू करण्याला परवानगी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कोविडसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्य खरेदीत पारदर्शकता नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड मिळवून देण्यात सरकारची उदासीनता आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, अशा अवस्थेत सरकारचा कारभार सुरू आहे. सरकारच्या घोषणांमध्ये आणि वास्तविक परिस्तिथीत मोठा फरक असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

आम्ही जिंकलोच होतो, पण आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून गेला.....

राज्यपालांना भेटण्यात काहीही गैर नाही. विरोधीपक्ष म्हणून तो आमचा अधिकार आहे. शिवसेनेची टीका केवळ सत्तेसाठी आहे. आम्हीही जिंकलोच होतो, पण आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून गेला, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेना आमच्यासोबत सत्तेत असतानाही विरोधी पक्षाची भूमिका निभावत होता. कधी केंद्रावर टीका, कधी कौतूक अशी शिवसेनेची वारंवार बदलणारी भूमिका असते, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details