महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 31, 2020, 10:39 PM IST

ETV Bharat / city

आठवड्याभरात सरकारचा मंदिरे उघडण्याचा प्रस्ताव - अनिल परब

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांना मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी दिली. याचा अर्थ सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली असे नाही, असे स्पष्टीकरण देखील मंदिर उघडण्याबाबत परब यांनी दिले.

minister
अनिल परब

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गेले 5 महिने मंदिर, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आता सरकार मंदिर उघडण्याबाबत सकारात्मक विचार करत असून आठवड्याभरात प्रस्ताव आणेल अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली. मंदिर खुली करण्यासोबतच जीम, रेस्टॉरंट, प्रार्थनास्थळं या बाबत चर्चा सुरू असून या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे परब म्हणाले.

मिशन बिगेन अंतर्गत हॉटेल व लॉज सुरू केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत अर्थकारण सुरू झाले नाही. त्यामुळे 100 टक्के व्यवसाय होणार नाही. तर जीम सुरू करण्याबाबत नियोजन सुरू आहे. जिममध्ये सोशल अंतर कसं राखता येईल याचा विचार सुरू आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरू करण्याबाबत केंद्र सरकार प्रथम निर्णय घेईल, मग राज्य सरकार घेईल असे स्पष्टीकरण परब यांनी लोकल सुरू करण्यावर दिले.

प्रकाश आंबेडकरांना मंदिर उघडण्यास नाही, दर्शन घेण्यास परवानगी


मुंबईच्या लोकलच्या डब्यातील गर्दीची परिस्थिती पाहता कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकल सुरू करण्या बाबत तातडीने निर्णय घेणे कठीण आहे. तसेच शाळा कॉलेज बाबतीतही आहे. सरकार टप्पाटप्याने सर्व सुरू करण्याबाबत विचार करत आहे, असे परब यांनी म्हटले. तर प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांना मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी दिली. याचा अर्थ सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली असे नाही, असे स्पष्टीकरण देखील मंदिर उघडण्याबाबत परब यांनी दिले.

. . . म्हणून हटवली ई-पास


गेल्या काही दिवसांपासून ई पास रद्द करावा अशी मागणी होत होती. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती आमच्याकडे होती, मात्र खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची नोंद होत नव्हती. कोरोनाचा प्रसार वाढत होता म्हणून प्रवाशांची नोंद असावी म्हणून आम्ही ई पास ठेवलं होता. मात्र आता महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारत चालली आहे. राज्याचं अर्थचक्र सुरू करायच आहे, यासाठी लोकांनी या राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणं आवश्यक आहे. उद्योगधंदे सुरळीत होण्यासाठी ई पास रद्द करणं सरकारला महत्त्वाचे वाटलं म्हणून ई पासची अट रद्द करण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details