महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत सेना-भाजप आमनेसामने

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेना आणि भाजप सदस्यांत बाचाबाची झाली. भाजप नगरसेविकांना सुरक्षा रक्षक बोलावून सभागृहाबाहेर काढण्याची धमकी स्थायी समिती अध्यक्षांनी दिली तर 'माझाच अपमान' केल्याचा दावाही स्थायी समिती अध्यक्षांनी केला आह.

By

Published : Feb 27, 2020, 8:28 AM IST

Updated : Feb 27, 2020, 7:23 PM IST

mumbai municipal meeting
मुंबई मनपा

मुंबई - राज्यात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद वाढू लागले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाही. भाजपच्या महिला नगरसेविकांना स्थायी समितीत बोलू दिले नाही, म्हणून त्यांनी आवाज चढवला. यावेळी स्थायी समिती अध्यक्षांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून सभागृहाबाहेर काढण्याचा इशारा दिला. स्थायी समिती अध्यक्षांनी महिला नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तर भाजपच्या नगरसेवकांकडून माझाच अपमान करण्यात आला असून सभा चालवायची असल्याने तसे बोलावे लागले, असा खुलासा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनी केला.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेना आणि भाजप सदस्यांत बाचाबाची....

हेही वाचा...'भाजप सरकारनेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला'

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दादरच्या टिळक पुलाबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत याणी हरकतीचा मुद्दा घेत पूल दुरुस्त करण्याची मागणी केली. याला भाजपच्या सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. यानंतर सँडहर्स्ट पुलाचा प्रस्ताव चर्चेला आला, या प्रस्तावात २५ करोडचे व्हेरिएशन होते. करदात्या मुंबईकरांचा पैसे कंत्राटदारांच्या घशात जाणार असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवावा, तो मंजुर करू नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, 'तुम्ही एकीकडे पुलाचे प्रस्ताव मंजूर करू नये म्हणता आणि दुसरीकडे पुलांचे काम लवकर करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करा असेही म्हणता. तुम्ही दुटप्पी भूमिका का घेता' असे बोलल्यावर भाजप नगरसेविका संतप्त झाल्या. यादरम्यान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अनेक प्रस्ताव मंजूर केले. यावेळी भाजप सदस्यांनी बोलण्याची संधी मागितली मात्र त्यांना बोलू न देताच प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेविका ज्योती आळवणी आणि राजश्री शिरवडकर संताप व्यक्त केला. त्या जोरजोरात बोलत असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, असेच चालणार असेल तर सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढावे लागेल, असा इशारा दिला.

हेही वाचा...'शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केल्यामुळे यातून भाषेचे सामर्थ्य दाखवण्याचे काम होईल'

अध्यक्षांनी माफी मागावी...

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून सभागृहाबाहेर काढण्याचा इशारा दिल्याने त्याचे पडसाद उमटले. भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर आणि ज्योती आळवणी यांनी पत्रकार परिषद घेत स्थायी समिती अध्यक्षांनी सभागृहाबाहेर काढण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. आम्ही प्रस्तावावर चर्चा मागितली, चर्चा करू न देणे हे योग्य नाही, महिला नगरसेविकांना सभागृहाबाहेर काढण्याची धमकी देणे योग्य नाही. स्थायी समिती अध्यक्षांनी धमकी देण्याचा आम्ही निषेध करत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी दोन्ही नगरसेविकांनी केली आहे. आम्ही पक्षाशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षांचाच अपमान करणे योग्य नाही...

मी नेहमी सदस्यांना बोलायला संधी देतो. सभेच्या नियमानुसार त्यांनी बोलण्यास मागितले असते, तर मी बोलायला दिले असते. सभा सुरू असताना ओरडून बोलणे, गोंधळ घालणे योग्य नाही. असे करून भाजप सदस्य सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अपमान करत होते. अध्यक्ष म्हणून सभा मला चालवायची असते. महिला नगरसेविका मोठमोठ्याने बोलत असल्याने शेवटी नाईलाज म्हणून सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढू; असे मला बोलावे लागले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 27, 2020, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details