महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी ७२९ कोटींचा निधी वितरीत; मदतीच्या आकडेवारीने भुवया उंचावल्या - Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार सत्तेत येताच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. जून महिन्यात आलेले तौक्ते वादळ आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना आतापर्यंत ७२९ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी वितरीत केल्याची आकडेवारी मदत व पुनर्वसन विभागाने दिली.

729 crore fund distributed for flood victims in maharashtra
अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी ७२९ कोटींचा निधी वितरीत

By

Published : Sep 30, 2021, 8:42 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या चार महिन्यांत तीन वेळा अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात आलेले तौक्ते वादळ आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना आतापर्यंत ७२९ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी वितरीत केल्याची आकडेवारी मदत व पुनर्वसन विभागाने दिली. आजही मदतीसाठी शासन दरबारी खेटे घालणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना, शासनाने दिलेल्या मदतीच्या आकडेवारीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • सरकार सत्तेत येताच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना -

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार सत्तेत येताच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून आला. कोकणात निसर्ग चक्रीवादळ धडकले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर राज्यातील विविध भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आजही महाविकास आघाडी सरकारची नैसर्गिक आपत्ती आणि आव्हानांनी पाठ सोडलेली दिसत नाही.

  • पावसाचा जोरदार फटका -

जूनमध्ये आलेले तौक्ते वादळ तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यातही पावसाने अनेक तालुक्यांमध्ये तुफान फटकेबाजी केली. तौक्ते वादळचा रायगड, चिपळुण, महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. लोकांची घर, सार्वजनिक रस्ते, पूल, विद्यूत पुरवठा, शेती आणि शासकीय इमारतींचे मोठे नुकसान झाले. पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, वृक्षांची, घरांची पडझड झाली. मत्स्य बोटी, जाळे, शेतीचेही नुकसान झाले. दुकानदार व टपरीधारकांची ही वाताहत झाली. सुमारे दीड ते दोन हजार कोटींचे नुकसान झाले. शासनाने यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार कोटींचा निधी वितरीत केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे म्हणणे आहे.

  • ऑगस्टमधील १० हजार कोटींचे पॅकेज -

ऑगस्टमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याची दाणादाण उडवली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, विदर्भातील अकोला व अमरावती या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. शेकडो घरे पाण्याखाली गेली होती. चिखलामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने मका, सोयाबीन, डाळिंब, ऊस, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाले. अनेक भागात दरडी कोसळून जीवितहानी झाली. सुमारे सात हजार कोटींचे नुकसान यावेळी झाले. शासन स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच तत्काळ मदतीसाठी १० हजार कोटींच्या निधीचे पॅकेज जाहीर केला. यापैकी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना सुमारे ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी वितरीत केल्याचे मदत व पुनर्वसनाचे स्पष्ट केले आहे.

  • अतिवृष्टीत झालेल्या जनावरांचा मृत्यू -

राज्यात अतिवृष्टीमुळे ७१ जणांचा मृत्यू तर ९७ जनावरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या घटनांचा पंचनामे करुन ३८८ कोटींचा निधी शासनाने वितरीत केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

  • केंद्राकडे केली होती निधीची मागणी -

राज्यात 2 वर्षात विविध वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर मदतीचा प्रस्ताव पाठविण्यास जिल्हाधिकारी यांना सांगितले असून केंद्राकडे अनेक वेळा मदत मागितली पण मदत मिळाली नाही. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी १०६५ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, केंद्राकडून फक्त २६८ कोटी रूपये देण्यात आले. जून-ऑक्टोबर २०२० मध्ये ३७२१ कोटीचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला. केंद्राने यावेळी केवळ ७०१ कोटी दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळ आपत्तीमध्ये २०३ कोटीचा प्रस्ताव होता, तो अद्याप मंजूर झाला नाही. जुलै २०२१ मध्ये १६५९ कोटींची मागणी केली होती. असे वारंवार केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत देताना हात आखडता घेत आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केली.

  • राज्यातील नैसर्गिक संकटे

राज्याने मागितलेली मदत आणि केंद्रांने दिलेली मदत -

  • राज्यात 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये झालेला अवेळी पाऊस आणि गारपीटसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 93.58 कोटींची मदत मागितली. मात्र, केंद्रीय पथक पाहणी करायला आले नाही. NDRF मधून मदत नाकारली.
  • निसर्ग चक्रीवादळ जून 2020 - राज्य सरकारने 1065.58 कोटींची मदत केंद्राकडे मगितली, केंद्राने फक्त 268.59 कोटी मदत दिली.
  • पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती - 999.64 कोटींची मागणी, केंद्राने दिले 151.53 कोटी
  • जून-ऑक्टोबर 2020 मधील अतिवृष्टी आणि पूर; राज्याने 3821.29 कोटींची मागणी केली, केंद्राने दिले 701 कोटी.
  • तौक्ते चक्रीवादळ 2021-राज्याने 203.34 कोटी मागणी केली, अजून केंद्राने निधी दिला नाही.
  • जुलै 2021 राज्याने 1659.51 कोटींची मदत मागितली, केंद्राने अजून मदत दिली नाही.

हेही वाचा -मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details