मुंबई -मुंबईतल्या गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यांमध्ये 21 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या बेपत्ता तरुणींची राज्य सरकार चौकशी करणार आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. तसेच या तरुणी नेमक्या गेल्या कुठे, हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण आहे का याचाही शोध घ्यावा असेही ते म्हणाले आहेत.
गेल्या 11 महिन्यांत गोवंडी परिसरातून 14 ते 30 वयोगटातील तब्बल 21 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोवंडी परिसरातून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी थक्क करणारी आहे. 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या 12 दिवसांत 7 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.