महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 5, 2019, 8:33 PM IST

ETV Bharat / city

खेकडे घेऊन पोलीस ठाण्यात आले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; म्हणाले 'यांच्या'वर करा खुनाचा गुन्हा दाखल

खेकड्यांनी धरण पोखरल्याचा हास्यास्पद खुलासा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने खळबळ उडाली होती. मंत्री सावंत यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आंदोलन करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

कोल्हापूर- खेकड्यांना दोरीला बांधून कार्यकर्ते घोषणा देत पोलीस ठाण्यात आले. या खेकड्यांना थेट पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर ठेवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणा वाढल्या, कार्यकर्त्यांनी या खेकड्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलीस निरीक्षकही चक्रावले. या खेकड्यांनी तिवरे धरण पोखरल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केल्याने आता करायचे काय असा सवाल पोलीस निरीक्षकांनाही पडला. हे अनोखे आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरात केले.

आंदोलन करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते


खेकड्यांनी धरण पोखरल्याचा हास्यास्पद आणि खळबळजनक खुलासा मंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट खेकड्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात घेऊन आले. या खेकड्यांनी धरण पोखरुन तब्बल 23 जणांचा बळी घेतल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे केला.


कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत या खेकड्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना आता काय करायचे असा सवाल पडला नसता, तर नवलच. त्यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.


या खेकड्यांना अटक करा, अन्यथा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर तरी गुन्हा दाखल करा, असा पवित्रा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. या बाबतचे निवेदन सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना देण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची कोल्हापूरसह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details