कोल्हापूर :राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ) जयंती दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र, यंदा सलग दुसऱ्या वर्षी शाहू महाराजांच्या जिवंत स्मारक असलेल्या राधानगरी धरण येथे मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी झाली. गतवर्षीपासून राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावर ( Radhanagari Dam ) साजरी केली जात आहे. शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे ( Samarjit Singh Ghatge ) यांच्या संकल्पनेतूनच ही जयंती साजरी होत आहे.
राधानगरी पाण्याचे जलपूजन आणि जलाभिषेक : यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. तसेच, अठरापगड जातीच्या लोकांचासुद्धा या शाहू जयंतीनिमित्त आयोजित पूजेमध्ये सहभाग होता. दरम्यान, या वर्षी भर पावसातसुद्धा नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे पुढच्या वर्षी यापेक्षाही थाटात जयंती साजरी करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे म्हणाले.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक :राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही, तर देशभरात साजरी होते. मात्र, शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घरण्यातून दत्तक घेतले गेले त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी करण्याचे ठरवले होते. गतवर्षीपासून याची सुरुवात झाली.
राधानगरी म्हणेज शाहू महाराजांचे जिवंत स्मारक : राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजले जाते. शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटवला. आजही या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. जेव्हा धरण 100 टक्के भरतं तेव्हा या धरणाचे दरवाजे आपोआप उघडले जातात, त्यामुळे या धरणाला अधिक महत्त्व प्राप्त होते.