कोल्हापूर - भीषण महापुरातून कोल्हापूर सावरते न सावरते तोच पुन्हा एकदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याला वरदान असलेले राधानगरी धरण 100 टक्के भरले असून या धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणामधून सध्या ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पुढच्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे ५ दरवाजे पुन्हा उघडले - kolhapur flood news
महापुरानंतर कोल्हापूर आता सावरत आहे. यातच पुन्हा पावसाचा जोर जिल्ह्यात वाढला आहे. यामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
![संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे ५ दरवाजे पुन्हा उघडले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4347826-397-4347826-1567689453885.jpg)
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 38 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेली असून गेल्या चोवीस तासांमध्ये गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. ज्या भागात पूर आला होता त्या भागातल्या लोकांना पुन्हा एकदा पावसाची भीती वाटू लागली आहे. दरम्यान, अलमट्टी धरणांमधून विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांची पाणी पातळीत वाढ होणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेली आहे.