महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 21, 2021, 1:46 PM IST

Updated : Jun 21, 2021, 6:29 PM IST

ETV Bharat / city

महाविकास आघाडी २५ वर्ष टिकेल; त्या पत्रातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - मुश्रीफ

तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय सुरू असून जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत आपल्या महाविकास आघाडीला कोणत्याही पद्धतीचा धोका नसून पुढचे 25 वर्ष आघाडी अशीच टिकून राहील, असा विश्वास सुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. यावर राज्यभरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा प्रताप सरनाईक यांचे पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे नेते फोडले जात असल्याबाबतची टीका सरनाईक यांनी केली होती. याबाबतही बोलताना असा कोणताही प्रकार होत नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


महाविकास सरकार 25 वर्षे टिकेल -

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, प्रताप सरनाईक यांनी सेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरं यावर आपण काही बोलणार नाही, तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्यांनी सत्तेत राहून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सेनेमधील नेते फोडून आपला पक्ष कमकुवत करत असल्याबाबत म्हटले आहे. राज्यात असे काहीही घडत नाही. उलट तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय सुरू असून जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत आपल्या महाविकास आघाडीला कोणत्याही पद्धतीचा धोका नसून पुढचे 25 वर्ष आघाडी अशीच टिकून राहील, असा विश्वास सुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, मुळात भाजकडून त्यांच्यावर विविध चौकशी मागे लावून दबाव टाकला जात आहे. शिवाय त्यांच्याकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, कोरोना काळात आपण मेहनत घेऊन एखाद्या कुटुंबप्रमुखासारखा महाराष्ट्राचा संभाळ केला आहे. महाराष्ट्र राज्यात सेनेचा मुख्यमंत्री बनवणार असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा शब्द आणि वचन आपण पूर्ण केला आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे. मात्र राज्यात जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील शिवाय आपला पक्ष कमकुवत करत असतील तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरं, असेही प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या पत्रानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर केलेल्या या आरोपाचे खंडन केले जात असून उलट हा भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत.

Last Updated : Jun 21, 2021, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details