औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहेत. असे असले तरी पर्यटन व्यवसाय अद्याप सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर आधारित व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यटन व्यवसाय सुरू होत नसल्याने सरकार विराधात व्यावसायिकांनी ऑनलाईन पद्धतीने निषेध नोंदवला आहे.
कोरोनामुळे मागील नऊ महिन्यांपासून देशात लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू उठवण्यात आले. त्यात सर्वात उशिरा पर्यटन उद्योगाला परवानगी मिळाली आहे. ताजमहल सुरू झाल्यावर महाराष्ट्रात असलेले मुंबई येथील एलिफंटा कॅव्हस सुरू करण्यात आल्या आहेत. रायगड येथील किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आला. मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जगातील मान्यता असलेले अजिंठा व वेरूळसारखे पर्यटन स्थळच का बंद आहेत? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित केला.
औरंगाबादचे जागतिक पर्यटनस्थळ उघडा सरकारची आर्थिक मदत नको, फक्त परवानगी द्या....कोरोनामुळे बंद पडलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर आर्थिक मदत जाहीर केली जात आहे. मात्र, आम्हाला ही मदत नकोय आम्हाला फक्त परवानगी दिलेला कागद द्या. हा एक कागद आम्हाला पुरेसा आहे. त्यामुळे सरकारने परवानगी दिली तर आम्ही आमचेच आत्मनिर्भर होऊ, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली. पर्यटन स्थळ बंद असल्याने डोलीवाले, फेरीवाले, यांच्या पासून तर हॉटेल, टॅक्सी गाईड असे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे यांना सरकारची आर्थिक मदत नाही तर फक्त परवानगी लागते ती द्या अशी विनंती व्यावसायिक अब्रार हुसेन, पपिंदरसिंग वायटी, आमोद बसलो व जसवंत सिंग यांनी केली.
अजिंठा लेणी येथील व्यावसायिक दोन वर्षांपासून अडचणीत..औरंगाबादपासून 110 किलोमीटर असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटन रोज येत असतात. कोरोनामुळे नाही तर दोन वर्षांपासून रस्ता नसल्याने अजिंठा लेणी परिसरातील व्यावसायिक आर्थिक अडचणीत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शाररिक आणि मानसिक त्रास होतो. लेणी पाहून गेलेला पर्यटन रस्त्यांमुळे पुन्हा येण्याची इच्छा नाही असे सांगतो. पर्यटनस्थळ सुरू करण्याबरोबर रस्तादेखील चांगला झाला पाहिजे, अशी मागणी अजिंठा लेणी परिसरातील व्यावसायिकांनी केली. लेणी परिसरातील दुकानदारांना दोन वर्षांचे भाडे माफ करून बिनव्याजी कर्ज द्या, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.
सरकारी अनास्थेमुळे पर्यटन स्थळ बंद...राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी दिली. ही परवानगी देत असताना रोज ठराविक क्षमतेपर्यंत भाविकांना दर्शन घेण्याची किंवा ऑनलाईन परवानगी असलेल्या भाविकांना दर्शनाची परवानगी दिली. याच नियमांच्या आधारे पर्यटनस्थळ उघडी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली. वारंवार विनंती करूनही पर्यटन व्यवसाय फक्त सरकारी अनास्थेमुळे बंद असल्याची टीका व्यावसायिकांनी केली.