महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक, दोन पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त - aurangabad crime news

औरंगाबादेत शस्त्रविक्रीसाठी आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हिनानगर येथे पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. आरोंपींकडून पिस्टल, काडतुसे, मोबाईलसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

three-arrested-for-selling-arms-in-aurangabad
औरंगाबादेत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

By

Published : Nov 9, 2020, 7:25 AM IST

औरंगाबाद - शहरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन जणांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने हिनानगरात अटक केली. पथकाने त्यांच्याकडून दोन पिस्टल, दोन दुचाकी, तीन मोबाईल असा तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अभिजित मधुकर वाघमारे (२२, रा. बोरगाव तारू, ता. भोकरदन, जि. जालना), बाळू दगडूबा खिल्लारे (२४, रा. खिल्लारे टाकळी, जि. जालना), कपिल रमेश जोगदंड (२५, रा. न्यायनगर गल्ली, बुद्ध विहाराजवळ, गारखेडा) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.


असा लागला छडा -
शनिवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाला हिनानगर भागात काही तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन रोडे यांच्या पथकाने साध्या वेशात हिनानगर भागात रात्री साडेअकराच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी तेथे अभिजीत आणि बाळु हे दोघे दुचाकीवर (एमएच-१४-सीबी-५९४९) आले. तर कपिल हा दुचाकीने (एमएच-2०-एफएफ-९८५६) आल्यावर तिघेही अंधारात एका खांबाजवळ उभे राहिले. यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने छापा मारला. त्याचदरम्यान, कपिलने दुचाकीवर धूम ठोकत जालन्याच्या दिशेने पळ काढला. तेव्हा हिनानगर भागातून अभिजित आणि बाळू या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीतून पोलिसांनी एक पिस्टल, मोबाईल, काडतुसे जप्त केली. तर कपिलचा पाठलाग सुरू ठेवला. जालना रोडवरील टोल नाक्यावर दुचाकी सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना काही अंतरावर पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून आणखी एक पिस्टल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या तिघांविरुध्द एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिस्टल विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात गोळीबाराची घटना -
गेल्या आठवड्यात शहरात गोळीबाराची घटना घडली होती. देवानगरीत पिस्टलच्या जोरावर हल्लेखोरांनी गोळीबार करत बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केले होते. त्याचवेळी त्याच्या डाव्या पायावर गोळी देखील झाडली होती. अपहृताला कारमधून नेत असताना आपत भालगावजवळ इंधन संपल्याने अपहरणकर्त्यांनी त्याला तेथेच सोडून पळ काढला होता. अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असताना आपत भालगावनजीक चिकलठाणा पोलिसांना कार दिसली होती. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर अपहृत जखमी असल्याचे निदर्शनास आले होते. या दोन्ही घटनांनंतर शहरात पिस्टल कोठून येतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details