महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चोरी गेलेल्या 'त्या' ५८ किलो सोन्यापैकी २१ किलो सोने पोलिसांकडून जप्त

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने दोन साथीदाराच्या मदतीने 58 किलो चोरले होते. या सोन्यापैकी तब्बल 21 किलो सोने आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे.

By

Published : Jul 6, 2019, 9:47 PM IST

जप्त केलेले सोने

औरंगाबाद- शहरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने दोन साथीदाराच्या मदतीने 58 किलो चोरले होते. या सोन्यापैकी तब्बल 21 किलो सोने आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. पोलिसांनी हे सोने मणप्पुरम गोल्ड फायनान्समधून जप्त केले आहे.

जप्त केलेले सोने आणि माहिती देताना पोलीस निरीक्षक


वामन हरी पेठे ज्वेलर्समधून चोरलेले सोने आरोपी राजेंद्र जैन याने बँकेत तारण म्हणून ठेवले. इतकेच नाही, तर 24 किलो दागिन्यांवर 4 कोटी 83 लाख 48 हजारांचा कर्ज जैनने घेतले होते. त्यापैकी एकूण 70 लाख रुपयाची परतफेड त्याने केली होती. चोरी गेलेल्या 58 किलोपैकी 21 किलोचे दागिने हे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. उर्वरित दागिने शोधण्याचे आव्हान आता औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेसमोर आहे.


अंकुर राणे हा समर्थ नगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत 15 वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याने दागिन्यांवरील टॅग काढून जानेवारी ते मार्च या दरम्यान 28 किलोचे हिरेजडित दागिने कापड व्यापारी असलेल्या राजेंद्र जैन आणि त्याची पत्नी भारती, भाचा लोकेश जैन यांना दिले होते. त्यातील 25 टक्के हिस्सा देण्याचे आमिष राणेला जैन यांनी दिले होते. या प्रकारचा भांडाफोड झाल्यानंतर मालक विश्वनाथ पेठे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. त्यावरून बुधवारी रात्री राजेंद्र जैन व त्याचा भाचा लोकेश जैन आणि व्यवस्थापक अंकुर राणे यांना पोलिसांनी अटक केली होती.

राजेंद्र जैन यांनी खरेदी केलेल्या नव्या महागड्या तीन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्यांनी सोन्याचे दागिने तारण ठेवून समर्थ नगरातील एका अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट खरेदी केल्याचेदेखील समोर आले आहे. या सर्वांनी चोरलेले सोने हे बँकेत तारण म्हणून ठेवत कर्ज काढले. त्या कर्जावर त्यांनी आलिशान गाड्या आणि फ्लॅट खरेदी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत 21 किलो सोन्याचे दागिने मणप्पुरम गोल्ड फायनान्स येथून ताब्यात घेतले आहेत. उर्वरित सोन्याचे दागिने आता जप्त करण्याचे आव्हान औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेवर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details