औरंगाबाद - रत्नागिरी येथून आंब्याचे २ लाख ५८ हजार रुपये मागण्यासाठी आलेल्या एका महिलेला जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे यांनी विभागीय क्रीडा संकुलात मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली असून, यात नावंदे यांच्याविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील विद्यार्थिनीला विक्रीसाठी आंबे मागवले, मात्र त्याचे पैसे मात्र दिलेच नाही. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरीतील दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२००८ मध्ये कविता नावंदे या रत्नागिरी येथे क्रीडा अधिकारी होत्या. त्यावेळी तक्रारदार १२ वीच्या वर्गात शिकत होत्या. खेळामुळे दोघींची ओळख झाली. मार्च २०२० मध्ये नावंदे यांनी फोनद्वारे पवार यांना हापूस आंब्याचा व्यवसाय करायचा असून, हापूस आंबे मिळवून देण्याची मागणी केली. पवार यांनी इतरांकडून ३०० हापूस आंब्यांच्या पेट्या नावंदे यांच्याकडे पाठविल्या. या व्यवहारातील काही पैसे दिल्यानंतर उर्वरित २ लाख ५८ हजार रुपये त्या देत नव्हत्या.