औरंगाबाद - विविध प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र, तंत्र विक्री करण्याबाबत जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी याबाबतच्या प्राप्त याचिकेवर सुनावणी घेतली. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रसार करणाऱ्यांवर अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने तीस दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली. यासंबंधी महिन्यात औरंगाबाद खंडपीठाला अवगत करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.
देवाच्या नावाने केली जाते फसवणूक...
प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू घेऊन भरभराटी होईल, अशा जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातात सर्वसामान्य नागरिकांची जाहिरातीतून फसवणूक होते. राज्यशासनाच्या २०१३मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर जाहिरात प्रक्षेपण करता येत नाही. याविरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील सिडको भागातील रहिवासी राजेंद्र गणपतराव अंभोरे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.