महाराष्ट्र

maharashtra

रेमडेसिवीरच्या काळाबाजारप्रकरणी घाटीच्या परिचारिकेचा पती अटकेत

By

Published : May 21, 2021, 8:07 PM IST

घाटी रुग्णालयातील परिचरिकेच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यानंतर परिचारिका फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

रेमडेसिवीर काळाबाजार
रेमडेसिवीर काळाबाजार

औरंगाबाद - कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार राज्यभरात सातत्याने उघड होतो आहे. औरंगाबादेतही रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आला असून यात घाटी रुग्णालयातील परिचरिकेच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यानंतर परिचारिका फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने एका चालकासह औषधी विक्री प्रतिनिधी (एमआर) अशा दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

परिचारिका झाली फरार

या प्रकरणी घाटीतील परिचारिकेने घोटाळा करून पतीकडे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी इंजेक्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून आरती नितीन जाधव यांना आरोपी करण्यात आले. गुन्हा दाखल होताच आरती मात्र फरार झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला हॉटेल विटस, हॉटेल बिटस् ते पीरबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण अवैधरित्या रेमडेसिवीर इंजेक्शन प्रति २५ हजार रुपये याप्रमाणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून औषधी निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोज शिंदे यांनी सापळा लावला असता, दोघेजण कारने (एमएच २० ईवाय ८७३४)मध्ये आल्याचे दिसताच त्यांना बेड्या होत्या.

कारमध्ये होत होती इंजेक्शनची विक्री

पोलिसांच्या अटकेत असलेले दोघे संशयित चक्क कारमधून रेमडेसिवीर विक्री करत असल्याचे समोर आले आहे. नितीन अविनाश जाधव (२८, चालक, रा. कोहिनूर कॉलनी), गौतम देविदास अंगरक (३६, एमआर, रा. गादीवाविहार) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. प्रत्येकी २५ हजार रुपयांना विक्री करणारे ४ रेमडेसिवीरसह कार, मोबाइल असा ८ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

घाटीने नेमली चौकशी समिती

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात विक्री करणारी आरती ढोले उर्फ आरती जाधव ही कंत्राटी परिचारिका असून, 30 मार्चला ती घाटीत रुजू झाली होती. या प्रकरणात चौकशी साठी डॉ. वर्षा रोटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल प्राप्त लवकरच होईल, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. रुग्णालयात कंत्राटी परिचारिकाऐवजी कायमस्वरूपी पदे भरावीत, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details