औरंगाबाद - महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून मृताच्या मुलाला नोकरी सामावून घेण्याचे व आर्थिक मदत करण्याचे आदेश महावितरणला दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्याने मृतदेह ताब्यात घेतला.
काय होती घटना?
आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम पठाडे हे २७ डिसेंबर रोजी गट क्रमांक ८९मध्ये शेतात शेळ्या चारत होते. शेतात विजेची तार गेली. त्या तारेच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. पठाडे यांचा हात त्या खांबाला लागताच ते खांबाला चिकटले. हे लक्षात येताच इतर शेतकऱ्यांनी त्यांना खांबापासून अलग केले. त्यांना गंभीर अवस्थेत औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र काल रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.