अमरावती- बुधवारी (दि. 5 जानेवारी) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र, घरातून मृतदेह परिसरा बाहेर नेण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे तब्बल 24 तास मृतदेह घरीच होता. अमरावती शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात ( Vrindavan Colony Area ) असणाऱ्या नाल्याच्याकाठी दोनशे घरांची वसाहत आहे. या भागात नाला ओलांडूनच जाता येते. नाल्यावर लाकडी ओंडके आणि तुटके लोखंडी खाट टाकून कशीबशी वाट तयार करण्यात आली आहे. या मार्गावरून जाताना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत मृतदेह परिसराबाहेर नेणे अशक्य असल्यामुळे चक्क घराशेजारीच चिता रचण्यात आली. जिल्ह्यातील मेळघाटात अनेक समस्या आहेत. मात्र, आज घडलेल्या घटनेने मेळघाटपेक्षाही गंभीर परिस्थिती अमरावती शहरात पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार
परिसरात येण्या-जाण्यासाठी रस्तात नाही. यामुळे तेथील नागरिकांनी जवळ असलेल्या नाल्यावरुन पाईप, लोखंडी साहित्याच्या सहायाने तात्पुरता पूल तयार केला आहे. यावरुन एका व्यक्तीलाही जायचे असल्याचे तारेवरची कसरत करत पूल पार करावे लागते. अशात बुधवारी (दि. 5 जानेवारी) वेणूताई मोंहोड या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मात्र, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह परिसराबाहेर नेण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ( No Road ) अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत चर्चा सुरू झाली. यात तब्बल 24 तास मृतदेह तसेच होते. अखेर गुरुवारी (दि. 6 जानेवारी) परिसरातील नागरिकांनी घराजवळच सरण रचत अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, काही नातेवाईकांनी यास विरोध केला आणि एक रुग्णवाहिका पुलाच्या पलिकडे बोलावली. त्यानंतर दोन तरुणांनी कसेबसे मृतदेह पुलाच्या पलिकडे नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह स्माशानभूमीत नेत पार्थीवार अंत्यसंस्कार करण्यात आले.