महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात बांबू उद्यान निर्मितीसाठी प्रयत्न करणार- वनमंत्री संजय राठोड

By

Published : Jun 14, 2020, 10:20 AM IST

अमरावतीतील बांबू उद्यानासारखी उद्याने राज्यातील इतर भागात उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. त्यांनी वडाळी परिसरातील बांबू उद्यानाला भेट दिली.

वनमंत्री संजय राठोड

अमरावती-शहरातील वडाळी परिसरातील बांबू उद्यान हे अप्रतिम आहे. या ठिकाणी देशभरातील विविध प्रजातींचे बांबू आहेत. अमरावती प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात बांबू उद्यान निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. याची जबाबदारी अमरावती येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या बांबू उद्यानाची वनमंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केल्यावर ते भारावून गेले होते.

राज्याचे वनमंत्री संजय राठोड दोन दिवसांच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी मेळघाटचा दौरा केल्यावर शनिवारी सायंकाळी ते अमरावती शहरातील वडाळी परिसरात असणाऱ्या वनविभागाच्या बांबू उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी वनविभागाच्या बचाव पथकाचा आढावा वनमंत्र्यांनी घेतला. मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांना सुखरूप वाचवून त्यांना जंगलात सोडणे. पिसाळलेल्या प्राण्यांना जखमी करून त्यांचा इलाज करणे यासाठी लागणारी विविध उपकरणे आदींची माहिती वनमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली.

बांबू उद्यानाची पाहणी करताना सर्वप्रथम त्यांनी बांबू संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू पाहून वनमंत्री चकित झालेत. बांबू उद्यानात असलेल्या जवळपास 75 प्रकारच्या विविध बांबूंची माहिती यावेळी वनमंत्र्यांनी जाणून घेतली. वडाळी बांबू उद्यान येथे जगभरातील विविध प्रजातीचे बांबू आहेत. या बांबूंची माहिती घेतल्यावर वनमंत्र्यांनी बांबू उद्यानातील कॅक्टस उद्यानाला भेट दिली. विविध प्रकारच्या कॅक्टसच्या प्रजाती आणि त्यांचे छानसे उद्यान पाहून वनमंत्री भारावून गेले.

अमरावतीसारखी बांबू उद्यान निर्मिती ही राज्यात सर्वच ठिकाणी व्हायला हवी. यासाठी आमचे प्रयत्न राहणार असून यासाठी अमरावती येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे, असे वनमंत्री म्हणाले.

कोरोनामुळे वनपर्यटन सध्या बंद आहे. राज्यातील इतर पर्यटन स्थळासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, वनपर्यटन त्वरित सुरू करण्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. 1 जुलै पासून राज्यातील सर्व वन पर्यटनस्थळे सुरू होणार असल्याचे संजय राठोड म्हणाले.

या भेटीच्या वेळी वनमत्र्यांसोबत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष दिनेश बूब, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक नरवणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details